जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : विविध मागण्यांचे दिले निवेदनवर्धा : यंदाचे साल शेतकरी बांधावाकरिता खडतर ठरत आहे. पावसाचे आगमन लांबल्याने सोयाबीन पिकले नाही तर कपाशीला रोगाला पछाडले आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. याकरिता नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे, तसेच शेतमालाला योग्य हमीभाव देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी सादर केलेल्या निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या. या निवेदनानुसार, सोयाबीन पिकाच्या नापिकीमुळे सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार रुपये भ्वा मिळावा तसेच कपाशीला १० हजार रुपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस असा शेतमाल विक्रीकरिता आणल्यास २४ तासाच्या आत धनादेश वितरीत करावा. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, ताडपत्री शिवणकला यंत्र द्यावे, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करा, लोकप्रतिनिधींकडे हजारो एकर जमीन एकवटली असून ही जमीन हस्तगत करीत शेतमजूराला सिलींग पाडून वाटप करावे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मधुकर निघोट व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
शेतमालाला योग्य हमीभाव द्या
By admin | Updated: October 17, 2015 02:51 IST