वर्धा : सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते; पण भाव वाढवून देण्याचे तर सोडाच असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. केवळ ४०५० रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमीभावाचा निषेध करीत राष्ट्रवादीने शेतकरी जगवायचा असेल तर प्रती क्विंटल १५०० रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. सदर बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले़ कृषी संजीवनी योजना अंमलात आली तो काळ हंगामाचा असल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नव्हता. आता कृषी संजीवनी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेला मुदतवाढ द्यावी़ विशेष घटक योजनेंतर्गत विहिरीसाठी देण्यात येणारे १ लाख रुपये अनुदान तोकडे असून ते २ लाख ५० हजार रुपये करावे, वीज पुरवठा उपलब्ध करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी भरीव अनुदान द्यावे, पीक कर्ज धोरण, आणेवारी पद्धत बदलावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून दिलासा द्यावा आदी मागण्या आहेत़ दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, शशांक घोडमारे, समीर देशमुख, शरयू वांदिले, संजय काकडे, डॉ. अहमद रिझवी, प्रा. खलील खतीब, संदीप किटे, संदीप भांडवलकर आदींनी जाहीर केली़
कापसाला क्विंटलमागे १५०० रुपये बोनस द्या- राकाँ
By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST