नदी, नाल्यांना पूर : सरासरी ९२.७५ मिमी पावसाची नोंद; शेतांना तळ्यांचे स्वरूप; घरांची पडझडवर्धा : जिल्ह्यात गत २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सेलू तालुका वगळता इतर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९२.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नदी नाले फुगले असून शेतांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. शुक्रवारी रात्री काही काळ विश्रांती दिल्यानंतर शनिवारी सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी उघडीप दिली. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण ७४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात वर्धा ८३.०६, सेलू ५६.०, देवळी ७८.०, कारंजा ८२, आष्टी ७६.०४, आर्वी १०५.०, हिंगणघाट १६०.०२ व समुद्रपूर तालुक्यात १००.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३१६.२३ मिमी पाऊस पडला असून त्याची सरासरी ४१४.५३ मिमी एवढी आहे. हवामान विभागाचे विदर्भात १० जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तो वर्धा जिल्ह्यात खरा ठरत असल्याचे दिसते आहे. जिल्ह्यात गत २४ तासात सेलू वगळता सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. आर्वीत शनिवारी सकाळपर्यंत १०५ मिमी पावसाची नोंद झाल्याने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ गेट २० सेमीने उघडले आहे. या धरणातून ४२४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे प्रशासन सज्ज असून सर्व प्रशासकीय यंत्रणानी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या आहेत.(प्रतिनिधी)वर्धा व हिंगणघाट तालुक्यात घरांची पडझड ४जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वर्धा तालुक्यात ४६ घरांची अंशत: पडझड झाली. हिंगणघाट तालुक्यात २३ घरांचे नुकसान झाले. हमदापूर येथे भिंत पडून एक बकरी दगावली. दोन जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.निम्न वर्धाची पातळी २७९.९४ मिटरवर ४शुक्रवारी संध्याकाळपासून निम्न वर्धा धरणाचे ३१ ही दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. यातच रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी कमी होण्याची चिन्हे नाही. शनिवारी दुपारपर्यंत धरणाची पातळी २७९.९४ मी एवढी होती. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शेतांना आले तळ्याचे स्वरूप४जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निम्न वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदी नाले फुगले असून यातील पाणी शेतात शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ४आंजी येथे शेतालगत बीएसएनल कंपनीने केबल टाकण्याकरिता खोदलेल्या नाल्या बुजविल्या नसल्याने रस्त्याचे पाणी वाहून जाण्यास अथडळा निर्माण होऊन ते पाणी शेतात शिरत आहे. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेलू वगळता जिल्ह्यात अतिवृष्टी
By admin | Updated: July 10, 2016 01:28 IST