रुपेश खैरी -वर्धा परिवहन मंडळातील काही वाहक तिकीटांत गडबड करीत असल्याचे समोर आले. शिवाय प्रवासादरम्यान असलेल्या गर्दीत तिकीटांच्या असलेल्या जुन्या ट्रे मधून तिकीटा देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाच्यावतीने तिकीट देण्याकरिता वाहकांना मशीन्स दिल्या; मात्र या मशीन्स अधिकाधिक नादुरूस्त असल्याने अडचणीच्या ठरत आहेत. प्रवासाकरिता परिवहन विभागाची गाडी निघताना वाहकाला तिकीट मशीन तपासणी करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी वाहकाला देण्यात येत असलेल्या मशीन्समध्ये अनेक बिघाड असतात. ही मशीन एखाद्या इमानदार कर्मचार्याच्या हाती आली तर तो त्यात असलेल्या बिघाडाकडे दुर्लक्ष करून प्रवाशाला योग्य तिकीट देण्याचा प्रयत्न करतो. याकरिता त्याचा वेळ वायाजातो; मात्र हिच बिघाड असलेली मशीन जर परिवहन विभागाच्या एखाद्या भ्रष्ट कर्मचार्याच्या हाती गेली तर तो त्याचा लाभ उचलल्या शिवाय राहत नाही. प्रवासादरम्यान काही वाहकांकडे असलेल्या मशीन्समधून प्रिंट निघत नसेल तर तो वाहक निघालेल्या कोर्या कागदावर पेनाने प्रवासाचे ठिकाण व तिकीटीचे दर लिहून देतो. ही तिकीट ग्राह्य धरण्यात येत नसल्याचे परिवहन विभागातून सांगण्यात आले आहे. प्रवाशाकडून घेण्यात आलेली ही रक्कम परिवहन विभागाच्या नाही तर त्या कर्मचार्याच्या खिशात जाते. काही मशीन्स मधून अर्धवट प्रिंट निघालेल्या तिकीटा वाहक प्रवाशांच्या हाती देतात. त्यात तिकीटांचा योग्य दर वा अंतर उमटत नाही. यातही घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिकीटीत असाच घोळ करणार्या जवळपास ३६ कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली. परिवहन विभागाच्या भरारी पथकाने राबविलेल्या मोहिमेत हा प्रकार उघड झाला आहे. परिवहन विभागाचे काही कर्मचारी असा प्रकार करीत असल्याचे उघड झाल्यानंतर तपासणी मोहीम अधिक गतीशील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रवासादरम्यान तर वाहक असा प्रकार करीत असतील तर प्रवाशांनी तशी तक्रार करणे गरजेचे आहे.
नादुरूस्त तिकीट मशिन्स ठरताहेत अडचणीच्या
By admin | Updated: May 24, 2014 23:48 IST