वाढोणा येथे अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:39+5:30
महसुली नोंदीनुसार वाढोणा मंडळामध्ये ९९ मि. मी. पावसाची नोंद आहे. पीडित शेतकरी आता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पीडित शेतकऱ्यांनी पीक आणि व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदार, आर्वी यांना शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा : अतिवृष्टीमुळे नाला व नदीचे पाणी तटबंध फोडून शेतात घुसल्यामुळे नदी व नाल्याच्या काठावरील शेतांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मागील अनेक दिवसांपासून परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आदीच चिंतेत असताना ४ सप्टेंबर बुधवारला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले लगतच्या शेतकऱ्यांचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झालेले आहे. नदी, नाले यांचे पाणी तटबंध फोडून शेतात घुसल्यामुळे लगतचे शेतकरी रहेमतखॉँ, दाउदखॉँ, यादव, भांगे, रत्नकला कामडी तसेच इतर शेतकऱ्यांचे शेत अक्षरश: खरडून वाहून गेलेले आहे. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पीक नष्ट झालेले आहे. तसेच यादव भांगे यांचे संत्रा पिकाचेसुद्धा नुकसान झालेले आहे. महसुली नोंदीनुसार वाढोणा मंडळामध्ये ९९ मि. मी. पावसाची नोंद आहे. पीडित शेतकरी आता शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. पीडित शेतकऱ्यांनी पीक आणि व शेतांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी तहसीलदार, आर्वी यांना शेतकऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
पुराने केले शेतकऱ्यांचे नुकसान
कन्नमवारग्राम- येथील अल्पभूधारक शेतकरी किसन आनंदराव वाघधरे यांच्याकडे स्वमालकीचे शेत आहे. त्यांनी तीन एकरात कापूस लावला आहे. शेताला लागून नदी आहे. त्यात या अल्पभूधारक शेतकऱ्याचे दरवर्षीच एक एकरातील पऱ्हाटीचे पीक शेतातून पूर वाहत जात असल्यामुळे नुकसान होते. संबंधित विभागाला याबद्दल माहिती देऊनसुध्दा शेतकऱ्याला मदत दिली जात नाही. नुकसान भरपाई मिळेल काय? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे. यापूवीर या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पण कोणताही शासकीय लाभ शेतकऱ्याला मिळाला नाही. अल्पभूधारक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी किसना वाघधरे यांनी केली आहे.