आर्वी : तालुक्यात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने व गारपिटीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पैसेवारी ५० पैशाच्या आत दाखविली होती. त्यामुळे तालुक्यातील ३६ गावे शासन अनुदानापासून वंचित होती. याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आता नव्या सर्वेक्षणात आर्वी तालुक्यातील उरलेल्या ३६ गावांची पैसेवारीही ५० च्या आत आली आहे. मागील हंगामात आर्वी तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. कपाशी व तुरीच्या पिकांनाही याचा फटका बसला होता. याबाबत शासकीय स्तरावरून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील २०८ गावांपैकी १७२ गावांचीच पीक पैसेवारी ही ५० पैशाच्या आत दाखविण्यात आली. ३६ गावांची आणेवारी ही ५० पैशाच्या वर दाखविल्याने या गावांतील नागरिकांवर अन्याय झाला होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून या संदर्भात प्रशासनास दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५० पैसे पैसेवारी खाली आर्वी तालुक्यातील उर्वरित ३६ गावांचाही समावेश करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व १०८ गावेही दुष्काळग्रस्त ठरली आहे. याबाबत लोकमतने सातत्याने नापिकी संदर्भात बातमी लावून धरली होती. आर्वी तालुक्यातील ३६ गावे नव्याने ५० पैसेवारीच्या आत आल्याने या गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणात ५० पैशाच्या आतील आणेवारीत ही गावे वगळण्यात आली होती. १७२ गावांचाच ५० च्या आत पैसेवारीत समावेश आधी करण्यात आला होता. ३६ गावातही दुष्काळी परिस्थिती होती. तरीही त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे या गावांचा समावेशही ५० पैसे आणेवारीच्या आत करण्याची मागणी वारंवार शेतकरी करीत होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने याची दखल घेत उर्वरीत तालुक्यातील ३६ गावांचाही ५० पैसेवारीच्या आत समावेश केल्याने तालुक्यातील सर्व २०८ गावे दुष्काळाच्या छायेत आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
२०८ गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत
By admin | Updated: January 10, 2015 01:50 IST