कोरोना ब्लास्ट ; एकाच दिवशी आढळले २०८ नवीन कोविड बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:17+5:30
कोरोना संकटाच्या काळातही गाफिल वर्धेकर नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात बेफिकर राहिल्याने कोरोनाने आपला प्रसार वाढविला. अशातच सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावे या हेतूने तसेच परिस्थित नियंत्रणात रहावी यासाठी जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दहा महिन्यातील उच्चांकी तोडत शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूने नवा विक्रम केला. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता तब्बल २०८ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवार जिल्ह्यात २०८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १३ हजार १२० झाली आहे.
कोरोना संकटाच्या काळातही गाफिल वर्धेकर नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात बेफिकर राहिल्याने कोरोनाने आपला प्रसार वाढविला. अशातच सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावे या हेतूने तसेच परिस्थित नियंत्रणात रहावी यासाठी जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल २०८ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १५ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकानी दक्ष राहण्याची गरज आहे.
जिल्ह्यात १ हजार ११७ ॲक्टिव्ह कोविड बाधित
शुक्रवारी जिल्ह्यात २०८ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी १९७ कोविड बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ११७ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
दोघांचा घेतला बळी
शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात वर्धा तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष तर हिंगणघाट तालुक्यातील ५४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोविडमुक्तांची संख्या झाली ११ हजार ६४८
शुक्रवारी तब्बल १९७ कोविड बाधितांनी कोविडवर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ६४८ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.