सुशील गावंडे : विद्यार्थी मार्गदर्शन विभागाद्वारे ‘समायोजन कौशल्य’ विषयावर चर्चासत्रवर्धा : यशस्वी जीवनासाठी तडजोड अत्यंत महत्त्वाची आहे. तडजोडीचे समायोजन आपल्या दैनंदिन जीवनात करणारी व्यक्ती कधीही अपयशी ठरत नाही. सर्वांना सामावून घेण्याची ही वृत्ती म्हणजे भारतीय संस्कृतीचीच देण आहे. यशाचे शिखर गाठण्यास ती पदोपदी उपयुक्त ठरणारी आहे, असे प्रतिपादन लता मंगेशकर महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थी मार्गदर्शन विभागाद्वारे आयोजित ‘समायोजन कौशल्य’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा तर अतिथी म्हणून उपअधिष्ठाता डॉ. केएसआर प्रसाद, विद्यार्थी मार्गदर्शन विभागाचे संचालक डॉ. राजेश झा, आयोजन समिती अध्यक्ष मानसशास्त्रज्ञ रुपाली सरोदे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गौरव सावरकर उपस्थित होते. या सत्रात डॉ. गावंडे यांनी समाजीकरण व असमाजीकरण यातील फरक समायोजनाच्या अनुषंगाने स्पष्ट केला. एखादी घटना घडणे (फार्मिंग), घटनेच्या परिणामाला सामोरे जाणे(स्टॉर्मिंग), घटनेशी साम्यावस्था निर्माण होणे(नॉर्मिंग) आणि समायोजन घडणे(अॅडजॉर्निंग), अशा टप्प्यांच्या सहाय्याने विषयाची मांडळी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यास आणि मैत्री या विषयावरही मनमोकळा संवाद साधला. शंकांचे निरसनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय डॉ. राजेश झा यांनी करून दिला. संचालन मिथिला पानसे यांनी केले. आभार रुपाली सरोदे यांनी मानले. या कार्यशाळेत आयुर्वेद अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
तडजोड हा यशस्वी जीवनाचा अनिवार्य भाग
By admin | Updated: December 13, 2015 02:17 IST