अभियंत्याच्या निलंबनासाठी मृतदेह नेला वीज कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:14+5:30
अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजारांचा दंड ठोठावला होता, असा मृत रामकिसन राठोड यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : मोई तांडा येथील शेतकरी रामकिसन सरदार राठोड (४५) यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याने आकसपूर्ण कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अभियंता अतकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी व मृताच्या परिवाराला १५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी यासाठी गुरुवारी दुपारी मृतदेह उपविभागीय अभियंत्यांच्या कक्षात नेण्यात आला. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. वरिष्ठांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजारांचा दंड ठोठावला होता, असा मृत रामकिसन राठोड यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. विशेष म्हणजे मृताच्या घरून जप्त केलेले साहित्य मीटर, वायर हे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आणलेच नाही. त्यामुळे अभियंता अतकरे मागील चार वर्षांपासून सराईत प्रकारे कार्य करीत आहेत, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृतदेह वीज कंपनीच्या कार्यालयात नेला तेव्हा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. भाजप गटनेते अशोक विजयकर, शहर अध्यक्ष अॅड. मनीष ठोंबरे, मोईचे पोलीस पाटील परसराम चव्हाण, उपसरपंच किसन महाराज चव्हाण यांनी उपविभागीय अभियंता आर.एम.खडसे यांच्यासोबत चर्चा केली. आश्वासन मिळाल्यावर मृतदेह बाहेर नेण्यात आला. अभियंता अतकरे दररोज विजेच्या चोरी प्रकरणात पैसे उकळतात, नागरिकांशी असभ्य वर्तन करतात, दररोज मद्य प्राशन करून धमकी देतात, यावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
यासंदर्भात कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांना माहिती देऊन परिस्थितीबाबत पुराव्यानिशी कागदपत्र पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कारवाईच्या नावाखाली वेठीस धरणाºया अभियंत्याला तत्काळ निलंबित न केल्यास कार्यालयात धडक देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ठाणेदार जितेंद्र चांदे, उपविभागीय अभियंता खडसे यांनी प्रकरण शांत केले.