पुलगाव : संसार सुखाचा व्हावा म्हणून आपलं कर्तव्य विसरून भौतिक सुखाच्या मागे लागून संस्कृतीचं भान न ठेवता वाटेल तसे वाहून आपण स्वत:च जीवन काटेरी बनवून घेतो़ परंतु जीवन जगताना दुसऱ्यांवर प्रेम करायचं असते, तेव्हाच कुटुंबात सुखस्वप्नांच्या पायघड्या तयार होतात़ पण फुलांच्या पायघड्या घालताना काट्यांच्या वेदनाही सहन करण्याचं सामर्थ्यसुद्धा निर्माण झालं पाहिजे़, असे विचार विचार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. पुलगावनजीकच्या सोरटा येथे माई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटन म्हणून त्या बोलत होत्या. तब्बल साडेसातशे पुरस्काराच्या मानकरी व अनाथांच्या आधारवड ठरलेल्या सिंधुताईनी सोरटा येथील मॉडेल हायस्कूलच्या ‘माई महोत्सवात’ विद्यार्थ्यांशी संवाद साधला़ अध्यक्षस्थानी डॉ़निर्मला भामोदे तर अतिथी म्हणून अॅड़ शोभा काळे यांची उपस्थिती होती. वैशाली जाचक यांनी रांगोळीने रेखाटलेले सावित्रीबाईच्या चित्रांनी अनेकांचे लक्ष वेधले़ मंचावर जि़प़ सदस्य गजानन निकम, पं़ स़ सभापती ताराबाई ताडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली, सरपंच अर्चना आंबेकर, उपसरपंच मंगेश मानकर, पुनेश्वर वनस्कर, महिला बालविकास अधिकारी मनीष कुरसंगे प्रमुख अतिथी होते़ प्रास्ताविक गजानन वनस्कर यांनी केले़ संचालन भारती लोणकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
फुलांच्या पायघड्या घालताना काट्यांचं बोचणंही सहन करा
By admin | Updated: January 10, 2015 01:52 IST