लोकसभेनंतर भाजपचा जनाधार ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:17+5:30

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले होते. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट मतदारसंघातून भाजपला बहुमत मिळाले होते. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाल्याने वर्धा आणि हिंगणघाटमध्ये भाजप, तर देवळी आणि पुलगावात काँग्रेसचे आमदार निवडून आले.

After the Lok Sabha, the BJP's base has collapsed | लोकसभेनंतर भाजपचा जनाधार ढासळला

लोकसभेनंतर भाजपचा जनाधार ढासळला

Next
ठळक मुद्देविधानसभेत काँग्रेसला मताधिक्य । हिंगणघाट मतदार संघ ठरला अपवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोदी लाटेवर स्वार होऊन मतदारांनी केंद्रात आणि राज्यातही भाजपला एकहाती सत्ता दिली. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे विधानसभेतही भाजपचे मताधिक्य कायम राहण्याची शक्यता होती; परंतु सहा महिन्यांतच मताधिक्य तब्बल ७२ हजार ९४४ मतांनी घटल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले होते. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट मतदारसंघातून भाजपला बहुमत मिळाले होते. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाल्याने वर्धा आणि हिंगणघाटमध्ये भाजप, तर देवळी आणि पुलगावात काँग्रेसचे आमदार निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चारही मतदारसंघांतून ३ लाख ७४ हजार ५६९ मते तर काँग्रेसला केवळ २ लाख ५५ हजार ९९७ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपला लोकसभेत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची अपेक्षा होती. त्यामुळे वरिष्ठांनी कंबर कसली होती. मात्र, मतदारांनी यावर्षी भाजपचे तीन आमदार निवडून दिले असले तरी मताधिक्यात ७२ हजार ९४४ मतांनी घसरण झाली आहे. ही घसरण मात्र हिंगणघाट मतदारसंघात बऱ्यापैकी रोखून धरण्यात यश आल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक प्रश्न, उमेदवारांप्रति असलेली लोकभावना तसेच भाजप पक्षांतर्गत वर्ध्यातील कलह या सर्व बाबींमुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार घसरला, हे मतदानानंतर दिसून येत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा या निवडणुकीत वर्धा वगळता देवळी व आर्वी मतदारसंघात दिसून आली. आर्वी येथे राहुल गांधींच्या सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय नियोजनबद्ध प्रचाराची साक्ष देणारा होता. तर देवळीत गेल्या पाच निवडणुकांपासून लढणारे उमेदवार यांना कुठे पेरणी केल्यावर मताचे पीक उगवणार आहे, याचे ज्ञान असल्याने त्यांचा मताधार वाढण्यास मदत झाली. या निवडणुकीत पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला वर्धा मतदारसंघात ७१ हजारांवर मतांचा पल्ला गाठता आला असला तरी काँग्रेसचा परंपरागत गड असलेल्या सेलू तालुक्यातील खड्डे बुजविण्यात भाजप उमेदवार यशस्वी झाले, हेही महत्त्वाचे आहे. भाजप तालुका ध्यक्षाने घोराडच्या सभेत शेतकºयाची कॉलर पकडल्यानंतर येथील मतदान भाजपला होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र घोराडच्याही अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसच्या बरोबरीत चालला. यामागचे कारण मतदारांनाही संभ्रमात टाकणारे आहे. भाजपचा जनाधार घसरण्यामागे विकासाचे शहरवासीयांना अति झालेले अजिर्ण व त्यातून नाराज झालेले लोक यांनीही भाजपविरोधात मतदान केले. हे कारण काँग्रेसचा जनाधार वाढविणारे ठरले.

देवळीत सेना व अपक्ष काँग्रेसच्या मताधिक्याजवळच
देवळी मतदार संघात काँग्रेस उमेदवाराने ७१ हजारांवर मत मिळविली. या मतदार संघात भाजपचे बंडखोर राजेश बकाणे यांनी ३९ हजार तर सेनेचे समीर देशमुख यांनी ३० हजार मते घेतली. या दोघांसोबतही सेना व भाजपचे पदाधिकारी लागून होते. या दोघांच्याही मताधिक्क्याचा विचार केला तर ६९ हजारांच्या घरात आहे. याचा अर्थ या मतदार संघात लोकसभेच्या मताधिक्यापर्यंत युुती पोहोचली, असाच होतो.

भाजपच्या मताचा काँग्रेससह अपक्षाला फायदा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य ७२ हजार ९४४ मतांनी घटले. त्यापैकी काँग्रेसच्या वाट्याला १९ हजार १०८ मते आली असून इतर ५३ हजार ८३६ मते ही अपक्ष उमेदवारांसह इतर उमदेवारांच्या पारड्यात पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचाही सूर आळविला जात आहे.

बंडखोरी आणि अपूर्ण आश्वासनांचा फटका
जिल्ह्यातील चार मतदार संघांपैकी आर्वी, वर्धा व हिंगणघाट मतदार संघ हा भाजप तर देवळी मतदार संघ शिवसेनेला गेला. त्यामुळे या मतदार संघात भाजपच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. परिणामी , लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य चांगलेच घटले.
हिंगणघाट मतदार संघातही काही प्रमाणात भाजपचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. हा मतदार संघ भाजपकरिता असल्याने शिवसेनेच्या उपनेत्यांनी बंडखोरी केली होती. त्याचा काहीसा परिणाम येथे दिसून आला.
भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले नाही. महागाईच्या झळा, वाढती बेरोजगारी आदींचा प्रभावही यावर पडल्याचे दिसून येत आहे.

Web Title: After the Lok Sabha, the BJP's base has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.