युरियाच्या टंचाईत ‘लिंकिंग’ची मुबलकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:51+5:30
जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापाशी व तूर हे प्रमुख पिके असून २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाची हुलकावणी, बियाण्यांमधील उगवण क्षमतेच्या अभावाने दुबार पेरणीच्या संकटातून सावरत पिके जगविण्यासाठी धडपडत असलेल्या शेतकऱ्यांना आता युरियाची आवश्यकता आहे. पण, अद्यापही जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यांपर्यंत आवश्यक असलेला युरियाचा साठा उपलब्ध झाला नाही. याचाच फायदा उचलत काही विक्रेते युरियाबरोबर इतर खत किंवा औषधी घेण्याची सक्ती करीत असल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याची ओरड होत आहे पण; कृषी विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये यावर्षी ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापाशी व तूर हे प्रमुख पिके असून २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यात सध्या ७० टक्केच्यावर पेरण्या आटोपल्या आहे पण, पावसाच्या दडीमुळे सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात गेल्या आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना आता खत देण्याची लगबग सुरु आहे. यासाठी युरियाची शेतकऱ्यांकडून मागणी होत असताना पुरवठ्याअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत ४३ हजार ८१ मेट्रीक टनचे आवंटन असून १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ३० हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा होणे अपेक्षित होते.
पण, केवळ १७ हजार ११४ मेट्रीक टनच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची अडचण वाढली असून याचाच फायदा घेत काही विक्रेते एका थैलीमागे ५० ते ७० रुपये जास्त घेऊन नेहमीच्याच ग्राहकाला देत आहे. इतरांसाठी यापेक्षाही जास्त दर आकारले जातात किंवा त्यांना परतवून लावले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
नाईलाजास्तव गरज असल्याने शेतकरी वाढीव दर आणि लिंकिंगचा भार सोसत युरियाची खरेदी करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देत शेतकºयांची होणारी लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.
हिंगणघाटात केवळ एकच रॅक पॉर्इंट
यावर्षी लॉकडाऊनमुळे युरिया पोहोचायला वेळ झाला असला तरी आलेल्या युरियाची सोयीनुसार विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यामध्ये हिंगणघाट रेल्वे स्थानकावर एकमेव रॅक पॉर्इंट आहेत. त्या ठिकाणी आलेला युरिया ४८ तासांत विक्रेत्यांपर्यंत पोहोचवायचा असल्याने पुरवठादाराकडून रॅक पॉईटपासून जवळ असलेल्या ठिकाणीच युरियाचा पुरवठा केला जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये त्यांच्या हक्काचा युरिया पोहोचत नसल्याने विक्रेत्यांसह शेतकºयांचीही अडचण झाली आहे.
डीएपी खताकरिता शेतकऱ्यांची होतेय धडपड
जिल्ह्यात १७ हजार ४६९ मेट्रीक टन डीएपीचे आवंटन असताना ८ हजार ५१८ मेट्रिक टनच डीएपी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या दिवसातही शेतकऱ्यांना युरिया व डीएपी मिळत नसल्याने खताअभावी उत्पादनात घट होण्याची शक्यताही शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.
शेतकरी सोयाबीन, कपाशी व इतर पिकांसाठी सरळ खत म्हणून युरिया व डिएपीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण, या दोन्ही खतांचा जिल्ह्यात सध्या तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आधी बियाणे तर आता खताच्या अडचणी असल्याने उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये युरियाचा पुरवठा होऊ शकला नाही. सप्टेंबरअखेरपर्यंत ४३ हजार मेट्रीक टनचे आवंटन आहे. १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत ३० हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा होणे अपेक्षित होते. पण, सध्या १७ हजार मेट्रीक टन युरिया उपलब्ध झाला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये २ हजार ६०० मेट्रीक टन युरिया उपलब्ध होणार आहे.
- संजय बमनोटे, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प.वर्धा.
जिल्ह्यामध्ये फक्त हिंगणघाट येथील रेल्वेस्थानकावरच रॅक पॉर्इंट आहे. तेथे युरियाचा पुरवठा करणाºयावर ना कंपनीचे नियंत्रण आहे ना कृषी विभागाचे. त्यामुळे रॅक पॉईंटपासून जवळ असलेल्या गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये युरियाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने विक्रेत्यांसह शेतकरीही अडचणीत आले आहे.
- रवी शेंडे, अध्यक्ष, जिल्हा कृषी व्यवसायी संघ.