लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हरयाणामधील सोनीपत जिल्ह्यातील १९ विद्यार्थी वर्धेत दाखल झाले आहेत. ते वर्षभर येथे राहून महाराष्ट्रीय संस्कृती, खानपान, सण, उत्सव, भाषा यांचा अभ्यास करून नंतर हरयाणात प्रचार व प्रसार करणार आहेत.
लगतच्या सेलू (काटे) येथे पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय आहे. या विद्यालयात गुरुवारी हरयाणातील सोनीपत येथील नवोदय विद्यालयातील नववीत असणारे ११ विद्यार्थी आणि आठ विद्यार्थिनी दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०२५-२६ या वर्षासाठी येथे आले आहेत. हे सर्व विद्यार्थी वर्षभर येथे राहून महाराष्ट्रातील संस्कृती, खानपान, पोशाख, अन्नधान्य, सण, उत्सव, मराठी भाषा यांचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर हरयाणात परतल्यावर ते सर्व बाबींचा हरयाणामध्ये प्रचार आणि प्रसार करणार आहेत. याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता साधणे आहे. हरयाणातील विद्यार्थ्यांनी प्रथम आपला आपला परिचय दिला. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अभ्यास करून महाराष्ट्रीयन संस्कृती हरयाणामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासाठी तरतूद
- नवोदय विद्यालयात भारताच्या संस्कृती आणि लोकांच्या विविधतेची आणि बहुलतेची समज वाढवण्यासाठी, एका विशिष्ट भाषिक प्रदेशातील एका नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या भाषिक प्रदेशातील दुसऱ्या शाळेत स्थानांतरित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार हरयाणाचे विद्यार्थी येथे आले आहे.
- प्राचार्य शैलेश नागदेवते, उपप्राचार्य सुनील पातोडे यांनी या विद्यार्थ्यांचे भावपूर्ण स्वागत केले. यावेळी संजय देवगडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.