(Image Credit : Travel India Destinations)
पावसाळ्याची अनेकजण चातकाप्रमाणे वाट बघत असतात. रिमझिम पावसात भिजणे, हिरव्या-हिरव्या झाडांमध्ये वेळ घालवणे, वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाणे या गोष्टींसाठी अनेकजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. जयपूर हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यात जयपूरचं सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलतं. त्यामुळे तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर जयपूरला भेट देऊ शकता.
एकाच मार्गावर अनेक नजारे
जवाहर सर्कलपासून ते आमेर फोर्टपर्यंतचा प्रवास तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. एकाच मार्गावर इतके वेगवेगळे आणि सुंदर नजारे बघायला मिळतात की, परत यायची इच्छाच होणार नाही. जर तुम्हाला मॉन्सून रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल आणि जयपूरही फिरायचं असेल तर या मार्गाने तुम्ही जाऊ शकता.
येथील खास बाब ही आहे की, जयपूरमध्ये तुम्हाला सहजपणे बाइकही रेंटवर मिळतील. जवाहर सर्कल ते वर्ल्ड ट्रेड टॉवर, जवाहर कला केंद्र, बिडला मंदिर, मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर झू, अलबर्ट हॉल, जौहरी बाजार, हवा महल, सिटी पॅलेस, जल महल, कनक घाट आणि आमेर महल. या मार्गावर तुम्हाला इतकं सगळं बघायला मिळेल.
एकापाठी एक महाल
आमेर किल्ल्याच्या वरच्या डोंगरावर जयगढ किल्ला आहे आणि जयगढच्या वरच्या डोंगरावर नाहरगढ किल्ला आहे. आमेर किल्ल्याच्या समोरच्या खिडकीवर उभे राहून तुम्ही हे तिन्ही किल्ले बघू शकता. प्रत्येक किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला साधारण दीड तासांचा वेळ लागेल.
ही रिस्क न घेणेच चांगले
आमेर ते नाहरगढ रोडवर तुम्ही बायकिंगचा आनंद घेऊ शकता. देश सोडाच जगातही असे कमीच स्पॉट असतील जिथे एकाच डोंगराच्या मार्गावर तुम्हाला तीन किल्ले बघायला मिळतील. पण या मार्गावर पावसाळ्यात बाईक रायडिंगचा करण्याचा सल्ला आम्ही देणार नाही. हा अनुभव तुमच्यासाठी रोमांचक असेलच पण पावसात रस्त्यांची स्थिती वाईट झाली तर तुम्हाला महागात पडू शकतं.
आणखी पुढे काय?
जर तुम्हाला रायडिंग करत आणखी पुढे जायचं असेल आणि तुम्हाला रिमझिम पावसात हत्ती सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हत्ती गावात जाऊ शकता. इथे तुम्हाला मोठ्या संख्येने हत्ती बघायला मिळतील. पण इथपर्यंत एखाद्या गाईडच्या मदतीनेच जावे. इथे लोकांची गर्दीही कमी असते.
काही शांत आणि सुंदर ठिकाणे
जर जयपूरमध्ये मॉन्सून शांत, कमी गर्दीच्या ठिकाणी एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही सिसोदिया गार्डनला जाऊ शकता. याला सिसोदिया राणीची बाग असंही म्हणतात. हे गार्डन क्रॉस करून तुम्ही पुढे चूलगिरी डोंगरांकडेही जाऊ शकता. पण इथे दिवसाच जावे. रात्रीच्या वेळी जंगली जनावरांच्या भीतीमुळे इथे जाण्यास बंदी आहे.