- जितेंद्र कालेकरलाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टाेळक्याने दुसऱ्या गटातील शिवम कराेतिया (वय २०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याच्या पाठीवर वार केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणामध्ये रवी शर्मा (वय १९) आणि तनिष सिंग (२२) या दाेघांनाही अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी गुरुवारी दिली. त्यांना दाेन दिवस पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी जयेश शर्मा याला या प्रकरणात अटक केली हाेती.
ठाण्यातील वागळे इस्टेट, साठेवाडी भागात २ जून २०२५ राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ज्ञानसाधना कॉलेजजवळ भावेश करोतिया (वय १६) हा तेथील मुलांसह रवी यांच्याबराेबर काॅलेजसमोरील रोडवर क्रिकेट खेळत हाेता. त्याचा रवी या साठेवाडीतील तरुणाबराेबर खेळण्यावरून वाद झाले. रवीने भावेशला मारहाणही केली. या वादानंतर तनीष सिंग याने शिवम याच्या पाठीच्या उजव्या बाजूला मागे वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर पसार झालेल्या तिघा आराेपींपैकी जयेशला ३ जून राेजी अटक केली हाेती. तर रवी आणि तनिष या दाेघांना १० जून राेजी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिली.