कल्याण : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या तांत्रिक कामांसाठी तज्ज्ञ समंत्रकाची नियुक्ती करण्यास स्थायीच्या सर्व सदस्यांनी विरोध दर्शविला. महापालिकेकडे अभियंते असताना समंत्रक नेमायचे कशाला, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. यावर समंत्रकाची माहिती पुढील सभेत सादर करा, असे आदेश देताना संमत्रक नेमण्याच्या प्रस्तावाला स्थगिती देत असल्याचे सभापती संदीप गायकर यांनी स्पष्ट केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारकडे सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. या प्रकल्पांतर्गत आधारवाडी डम्पिंग बंद करणे, शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प राबविणे, बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करणे, दैनंदिन निगा राखणे आदी कामे करायची आहेत. त्यामुळे या तांत्रिक कामांसाठी तज्ज्ञ समंत्रकाची नियक्ती करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत दाखल केला होता. या कामासाठी महापालिका एक कोटी ८९ लाख रुपये खर्च करणार आहे. एवढी रक्कम समंत्रकावर खर्च करण्यापेक्षा आपल्या अभियंत्यांना हे काम द्या, असा सूर सदस्यांनी आवळला. यापूर्वीही समंत्रक नेमले आहेत. ते काय करतात? असाही सवाल केला. घनकचरा व्यवस्थापनाचे काम निकडीचे असल्याने सदस्यांनी समंत्रक नेमण्यास मान्यता द्यावी, असे मत कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, समंत्रकाची माहिती सभागृहाला द्यावी, त्यानंतरच प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल, ही सदस्यांची भावना लक्षात घेता गायकर यांनी तुर्तास प्रस्तावाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.
समंत्रक हवेत कशाला?
By admin | Updated: November 9, 2016 03:39 IST