ठाणे: वागळे इस्टेट हाजूरी भागातील खलील अन्सारी यांच्या तळ अधिक एक मजली घराची भिंत बाजूच्या घरावर काेसळल्याची घटना शुक्रवारी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.हाजुरीतील मौलाना आझाद शाळेजवळ गंगाधर चाळीमधील अन्सारी यांच्या ३५ वर्ष जुने बांधकाम असलेल्या घराची २० फूट लांब आणि पाच फूट उंच भिंत बाजूला असलेल्या घरावर पडली. ही माहिती मिळताच माजी नगरसेविका नम्रता फाटक, ठामपाचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्यासाठी भेट दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.ही भिंत अग्निशमन दलाच्या जवानांनी काढून बाजूला केली. या भिंतीमुळे बाजूला असलेल्या बाबूलाल विश्वकर्मा यांच्या घराचे पत्रे तुटून नुकसान झाले. आहे.सुरक्षेच्या कारणासाठी खलील अन्सारी, सादिक अन्सारी, निजाम अन्सारी आणि विश्वकर्मा यांची चार घरे रिकामी केली आहेत. त्यातील २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या एका मदरसामध्ये केली आहे.
ठाण्यात हाजूरी भागातील घराची भिंत काेसळली, जिवित हानी टळली; २८ कुटूंबीयांना मदरशामध्ये हलविले
By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2025 23:06 IST