ठाणे : ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिणाऱ्यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक, लेखक शरद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढायची वेळी आली नसती, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करून पाप झाकता येणार नाही, असा टोमणाही शिंदेंनी राऊत यांना लगावला.
शरद कुलकर्णी लिखित, अमलताश बुक्स प्रकाशित ‘ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिंदे म्हणाले की, कुलकर्णी यांचे पुस्तक वाचल्यावर चित्तथरारक अनुभव वाचकांना वाचायला मिळतील. गिर्यारोहण हे केवळ साहस नसून ती जीवनशैली आहे. कुलकर्णी यांच्यासारखे अनेक धाडसी लोक या ठाण्यात राहतात, साहसी वृत्ती ठाणेकरांमध्ये आहे. मी डॉक्टर नसलो तरी छोटी- मोठी ऑपरेशन करतो.
कुलकर्णी यांच्यातील निर्धार, साहस, लढाऊ वृत्तीचे मार्गदर्शन तरुणांनी घेण्याची गरज आहे. यावेळी मनोज शिंदे, रामकृष्ण नेत्रालयाचे डॉ. नितीन देशपांडे उपस्थित होते.
प्रसंग घडले, लिहीत गेलो... डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले की, या पुस्तकाचा आशय निखाऱ्यासारखा धगधगता आहे. पुस्तक वाचताना प्रत्यक्ष तेथे गेल्याचा अनुभव मिळतो. अशा प्रकारचे जगातील एकमेव पुस्तक आहे. शरद कुलकर्णी म्हणाले की, माझ्यासोबत जे प्रसंग घडले ते मी लिहीत गेलो आणि त्यातून पुस्तक साकारले. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल. यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदेही उपस्थित होते.