मुंबई - ठाणे-बोरीवली बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दररोज ३०० ते ५०० डंपरच्या वाहतुकीमुळे रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेत मंगळवारी खा. नरेश म्हस्के यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली. बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवासी संघाचे सदस्य आणि युवासेनेचे नितीन लांडगे उपस्थित होते. बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघांच्या प्रतिनिधींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.