ठाण्यात एका तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. भिवंडी शहरातील मानकोली भागातील सुरई गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या मुलाला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कैसर अजगर अली (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत आणि आरोपी मुलगा दोघेही सुतार काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी दुपारी एका घराचे काम करताना जेवण शिजवण्याच्या आणि भांडी धुण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपी मुलाने जवळ असलेल्या प्लाय कटरने कैसरवर हल्ला केला.
या घटनेत कैसरच्या खांद्यापासून मानेपर्यंत गंभीर जखमा झाल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, बुधवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामत यांनी दिली. या घटनेतील आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.