नायगाव : बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने १९७५ साली अंगणवाडी हा पर्याय आणला. वसईतील अर्नाळा येथे मात्र या अंगणवाडी बांधणीचा पायाच कमकुवत झाल्याने सदर अंगणवाड्यांची बांधकामे किती काळ टिकतील याबाबत शंका आहे. अर्नाळ्यातील असाच निकृष्ट बांधकामाचा ग्रामस्थांनी चांगलाच समाचार घेत हे काम बंद पाडले.अर्नाळा ग्रा. पं. हद्दीतील विविध ठिकाणी ३ अंगणवाड्या मंजूर झाल्या. त्यासाठी १८ लाख रू. चा निधीही पुरवण्यात आला, मात्र बच्यावपाडा येथे उभी राहणारी अंगणवाडीची वास्तु स्थानिकांनी बंद पाडली. बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून लोखंडी सळ्या गंजलेल्या स्थितीतच वापरण्यात येत असल्याचा स्थानिकांनी यावेळी आरोप केला. कंत्राटदाराला तुर्तास हे काम थांबवण्यास भाग पाडले आहे. परंतु पुढे काय? पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यातच उशिराने सुरू झालेल्या या कामाच्या मजबुतीबाबत शंका आहेत. यापुर्वी रहिवाशांपैकी एखाद्या घरात अंगणवाडी भरवली जायची, मात्र आता स्वतंत्र नव्याने अंगणवाड्या उभ्या राहणार असल्याने स्थानिकांत समाधान होते.या विकासकामात निकृष्ट साहित्य वापरून कंत्राटदार स्वत:चा फायदा करून घेणार आहेत, मात्र अशा स्वरूपाच्या वास्तु किती काळ टिकतील याबाबत शंका असल्याने दु्रतगतीने सुरू असलेले हे बांधकाम रहिवाशांनी बंद पाडले. प्रतिकुल घटकांचे निराकरण होऊन ३ वर्षाखालील बालकांचे संवर्धन व्हावे, म्हणून केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणली. त्याचे फायदे स्थानिकांना मिळण्यापुर्वीच थेट बांधकामातच गोंधळ असल्याने योजनांवर प्रश्नचिन्ह असल्याने स्थानिक आक्रमक आहेत. (वार्ताहर)
अंगणवाडीचे निकृष्ट काम बंद
By admin | Updated: June 9, 2014 00:20 IST