सत्तेच्या धुंदीत रामभाऊ विस्मृतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:47 AM2018-02-19T00:47:07+5:302018-02-19T00:47:12+5:30

जनसंघ आणि भाजपाचा पाया ज्यांनी रचला, मजबूत केला त्या दिवंगत प्रा. राम कापसे यांचेच भाजपाला विस्मरण झाले आहे.

Rampabhau forgetful of power! | सत्तेच्या धुंदीत रामभाऊ विस्मृतीत!

सत्तेच्या धुंदीत रामभाऊ विस्मृतीत!

googlenewsNext

प्रशांत माने
कल्याण : जनसंघ आणि भाजपाचा पाया ज्यांनी रचला, मजबूत केला त्या दिवंगत प्रा. राम कापसे यांचेच भाजपाला विस्मरण झाले आहे. कल्याण नगर परिषदेचे नगरसेवक ते नायब राज्यपाल अशी प्रदीर्घ राजकीय वाटचाल केलेल्या आणि ठाणे जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रूजविणाºया कापसेंचे शहरातील दर्जेदार वास्तुला नाव देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान राखणे सहज शक्य होते, पण सत्तेच्या धुंदीमुळे भाजपाला कापसे यांचा पुरता विसर पडल्याने अपक्ष नगरसेवक अरूण गीध यांनी मंगळवारच्या महासभेत त्यांच्या प्रभागातील रस्त्याला दिवंगत राम कापसे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर करून भाजपा नगरसेवक, उपमहापौर, सभापती, आमदार, मंत्री आदींच्या डोळयात झणझणीत अंजन घातले आहे.
उत्तम संसदपटू, संघटन कौशल्य, मनमिळाऊ स्वभाव अशी ओळख असलेल्या राम कापसे यांचा त्यांच्या राजकीय वाटचालीत नगरसेवक, आमदार, खासदार, त्याचबरोबर अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल असा प्रवास झाला. शिवाय ते १९५९ ते १९९३ या कालावधीत रूपारेल महाविद्यालयात प्राध्यापकही होते. जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा या पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. सप्टेंबर २०१५ मध्ये राम कापसेंचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण-सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आदी भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली. शोषितांसाठी काम करणारा नेता, चांगला संसदपटू उत्तम वक्ता, साधी राहणी उच्च विचारसरणी, आपला वाटणारा माणूस अशा प्रतिक्रिया मान्यवरांमधून व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यात तेव्हा येऊ घातलेली २०१५ ची कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पाहता त्यावेळी शहरभर कापसेंच्या श्रध्दांजलीचे फलक लावण्यात भाजपा पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची स्पर्धा लागली होती. मात्र या धुरीणांना आता राम कापसे यांचा पूर्णपणे विसर पडला आहे. कापसे यांचे निधन होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, पण कल्याण-डोंबिवली शहरातील एकाही वास्तूला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला नाही.
दरम्यान अपक्ष नगरसेवक अरूण गीध यांनी मांडलेला कापसे यांच्या नामकरणाचा ‘प्रस्ताव’ भाजपा पदाधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘चिंतन’ करणारा ठरला आहे. गीध हे गेली अनेक वर्षे काँग्रेसचे नगरसेवक होते. मात्र २०१५ च्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मंगळवारी पार पडणाºया महासभेत नामकरणाचे दहा प्रस्ताव आहेत. यात कल्याण शहरातील सहजानंद चौक ते अहिल्याबाई चौक या रस्त्याचे ‘कै रामभाऊ कापसे मार्ग’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव गीध यांनी मांडला आहे. केडीएमसीत भाजपाचे ४२ नगरसेवक आहेत. परंतु यातील एकाही नगरसेवकावा कापसे यांचे नाव कुठल्यातरी वास्तुला द्यावे, असे का वाटले नाही असा सूर जुन्या आणि ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. कल्याण पश्चिमेत सहा महिन्यांपूर्वी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आणि शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन उद्यानांचे भूमिपुजन पार पडले त्यावेळीही कापसेंचे नाव यापैकी एका उद्यानाला द्यावे, असे आमदारांना वाटले नाही. डोंबिवलीवर कापसेंचे खूप प्रेम होते. डोंबिवलीकरांनीही कापसेंना भरभरून मते दिली, पण तेथील नगरसेवक-पदाधिकाºयांना कापसे यांच्या पश्चात त्यांच्या स्मृती जपाव्या, याची जाणिव नसणे ही पक्षीय नितीमत्तेची शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
भाजपाला कापसे यांच्या विसर पडला असताना एक काँग्रेसी पार्श्वभूमी लाभलेले अपक्ष नगरसेवक कापसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नामकरणाचा प्रस्ताव सादर करतात, हे निश्चितच वाखाणण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
\
कापसे यांच्या स्मृती जपणे, हे खूप आधी व्हायला पाहिजे होते. पण आम्ही कुठेतरी कमी पडलो हे आम्हाला मान्य आहे. मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. नामकरणाच्या प्रस्तावाबाबत अरूण गीध यांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढच्या काळात कापसे यांच्या स्मृती जपल्या जातील, याची मी निश्चितपणे काळजी घेईन, असे केडीएमसीचे सभापती राहुल दामले म्हणाले.

पूल आणि विद्यापीठाला नाव देऊ : कापसेंचा विसर पडलेला नाही. दुर्गाडीच्या पुलाला रामभाऊ कापसेंचे नाव देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्राला देखील कापसेंचे नाव देण्याची मागणी केल्याचा दावा करताना कापसे यांच्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक असल्याने गीध यांनी संबंधित नामकरणाचा प्रस्ताव मांडला असेल, अशी प्रतिक्रिया कल्याण पश्चिमचे भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. ती भाजपा राहिलीय कुठे? : रामभाऊ कापसेंचा आदर्श मानणारी भाजपा आता राहिली आहे कुठे? ती पण त्यांच्याबरोबर अनंतात विलीन झाली आहे. सध्याची भाजपा ओरिजनल राहिली आहे का? हा संशोधनाचा विषय आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते असलेले मनसेचे मंदार हळबे यांनी दिली.

Web Title: Rampabhau forgetful of power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.