ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. तर, दुपारी ऐन शाळा सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना घर गाठताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६६३ एमएम पाऊस पडला आहे. ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. खाडीला भरती आलेली असल्यामुळे ४.७२ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. तर, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर येथील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. यातील लक्ष्मण भिवा पुरवार (२५) याचा बुडून मृत्यू झाला असून अनिकेत उत्तम काळे (२५) हा तरुण बचावला आहे. त्याच्यावर कल्याण येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहे.आगामी २४ तासांत कोकणात या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सातही तालुक्यांत मागील २४ तासांच्या कालावधीत ६६३ मिमी पाऊस पडला असून सरासरी ९४.७१ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरू असलेला हा पाऊस भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३७ मिमी पडला आहे. तर, याखालोखाल ठाणे येथे ११२ मिमी, कल्याण १०३, उल्हासनगर ९४, अंबरनाथ ८६.६०, शहापूरला ७१.४० मिमी पाऊस पडला असून मुरबाडला सर्वात कमी ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता
By admin | Updated: July 3, 2016 03:25 IST