नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशात भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीत घाबरून जाऊ नये, यासाठी भिवंडीत ऑपरेशन अभ्यास या नोकरीचे आयोजन शनिवारी शहरातील कामतघर येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवन येथे करण्यात आले होते. यावेळी भिवंडी अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन टीम, महाराष्ट्र नागरी सुरक्षा बल,होमगार्ड,राज्य सुरक्षा बल,पोलीस व मनपा आपत्ती विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सायरन वाजवून या अभ्यास मोगली सुरुवात करण्यात आली. युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी गोंधळ गडबड अथवा घाबरून न जाता एका जागी स्थिर राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.त्यांनतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अथवा जखमींना कशा प्रकारे मदत करायची याची प्रात्यक्षिके देण्यात आली.
याठिकाणी हवाई हल्ला व बॉम्ब हल्ल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या,अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या व धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविलणे,संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, अशी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.तहसिलदार अजय घोळवे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते.
युद्धजन्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, नागरिकांनी घाबरून न जाता अशा परिस्थितीशी कशा पद्धतीने सामना करावा यासाठी या अभ्यास मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप यांनी दिली आहे