Mumbai Local Train Accident: मुंबई मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन फास्ट लोकल ट्रेनमधून पडून भीषण अपघाताची घटना घडली. सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन्ही लोकलमधील फुटबोर्डवरुन प्रवास करणारे प्रवासी एकमेकांना धडकले आणि रेल्वे ट्रॅकवर पडले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारा मनसे कार्यकर्ताही या अपघातात जखमी झाला आहे. त्यामुळेच, या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.
सोमवारी सकाळी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान फास्ट लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले प्रवासी हे कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन्ही लोकलमधील होते. ट्रेनमध्ये फुटबोर्डवर लटकून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या बॅग खाली पडल्यानंतर बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांची त्यांना धडक बसली आणि ते खाली पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र प्रवासी दरवाज्यात लटकल्याची अफवा असल्याचे मनसे पदाधिकाऱ्याने म्हटलं. कुणाल नावाच्या मनसे पदाधिकाऱ्याने मुंब्रा स्थानकावर असलेल्या धोकादायक सिग्नल आणि वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले होते. कुणाल यांच्यासोबत त्यांच्या दोन मित्रांनीही यासाठी पत्रव्यवहार करत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र ते दोघेही या अपघातात जखमी झाले आहेत.
"कळवा रुग्णालयात जेव्हा प्रवाशांना आणलं तेव्हा मी सुरुवातीपासून इथे होतो. त्यांना प्रचंड मार लागला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. रोज एक ते दोन प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो. त्याबाबतीत आम्ही सतत प्रशासनासोबत बोलत आहोत. प्रशासनासोबत पत्र व्यवहार करत आहोत. आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणाल नावाच्या महाराष्ट्र सैनिकाने तीन महिन्यांपूर्वी रेल्वेची पत्रव्यवहार केला होता. त्याच्यासोबतच्या महाराष्ट्र सैनिकांनी तीन महिन्यांपूर्वी रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल आणि वळणावर मोठी घटना होऊ शकते यासंदर्भात पत्र दिले होतं. याबाबतीत काम करायला हवं असं या पत्रात म्हटलं होतं. या कामासाठी जी दोन-तीन मुलं पाठपुरावा करत होती त्यातील एकाचे या दुर्घटनेत पाय गेले आहेत. जो मुलगा हे सगळं घडू शकतं असं सांगत होता त्याचेच या अपघातात पाय गेले आहेत," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं.
दरम्यान या रेल्वे अपघातात राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा), केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर), मयूर शाह (वय ५० ), विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी) यांचा मृत्यू झाला आहे.