कल्याण : आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात घडला. दरम्यान, या मुलींनी धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.अल्पवयीन मुली उल्हासनगर येथे राहत आहेत. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील एका हॉटेलमध्ये त्यांची आई कामाला आहे. काही कामानिमित्त सायंकाळी त्या आईच्या हॉटेलवर आल्या होत्या. तेथून घरी परतण्यासाठी तिसगावनाका येथे दोघींनी रिक्षा पकडली. रिक्षा श्रीराम चौकाकडे जात असताना रिक्षाचालकाने दोघींकडे त्यांच्या आईचा मोबाइल नंबर मागितला. त्यास त्यांनी नकार दिला असता दोघींना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, घाबरून दोघींपैकी एकीने धावत्या रिक्षातून उडी मारली व रिक्षाचा पाठलाग करत आरडाओरडा केला. अखेर, या रिक्षाचा पेट्रोलपंपाजवळ वेग कमी झाल्याने दुसºया मुलीनेही रिक्षातून उडी मारून घरी पलायन केले. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आईचा मोबाइल नंबर न दिल्याने रिक्षाचालकाने केले दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:49 IST