गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला
By Admin | Updated: September 11, 2016 02:13 IST2016-09-11T02:13:48+5:302016-09-11T02:13:48+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....... च्या जयघोषात, गुलाल उधळीत आणि ढोलताशांच्या गजरात ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात घरगुती आणि सार्वजनिक अशा

गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....... च्या जयघोषात, गुलाल उधळीत आणि ढोलताशांच्या गजरात ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात घरगुती आणि सार्वजनिक अशा सुमारे १९ हजार ६५ सहा दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे तर, १४ हजार ६ गौरी मातांचे विसर्जन शनिवारी सायंकाळी करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांना गहिवरुन आले होते.
सहा दिवस मनोभावे गणरायाची विधिवत पूजा केल्या नंतर शनिवारी सायंकाळी आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांना निरोप देण्यात आला. यावेळी पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह जिह्यातील सातही पालिकांनी केलेल्या विशेष विसर्जनघाटांचा गणेशभक्तांनी उपयोग करून घेतला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकूण १९ हजार ६५ घरगुती आणि २८ सार्वजनिक सहा दिवसीय गणपतीचे तर, १४ हजार ६ गौरी मातांचे विसर्जन कृत्रिम आणि नैसर्गिक तलाव त्याचप्रमाणे नद्यांमध्ये करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेने यावषीही इकोफे्रंडली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनाकरता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.
रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजीनिवाडी, बाळकूम, खारेगाव आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची पालिकेने निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्य कलशही उभारण्यात आले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था, खाणपान सेवा, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दरम्यान, परिमंडळ १ मध्ये ६ हजार १९७ घरगुती, २० सार्वजनिक गणपती तर, एक हजार ६०३ गौरी माता, परिमंडळ २ मधील ९२० गौरी माता, परिमंडळ ३ मधील ४ हजार ५०० घरगुती, २ सार्वजनिक गणपती तर, दोन हजार ६३० गौरी माता, परिमंडळ ४ मधील ७ हजार ७१५ घरगुती गणपती तर, ७ हजार २२५ गौरी माता, परिमंडळ ५ मध्ये ४४० घरगुती, १२ सार्वजनिक गणपती तर, १, ५५८ गौरींचे विसर्जन झाले.
टोकावडे शांतता
टोकावडे गावातील ३५ गणेश मूर्ती व दोन गौरींचे या कनकविरा नदीवर विसर्जन करण्यात आले. यावेळी डी.जे च्या तालावर गावातील तरु ण मंडळीसह मोठ्यांनी ताल धरून काढलेली मिरवणूक संपण्यासाठी तब्बल चार तास लागले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कल्याण-डोंबिवलीत ७,५०० मूर्तींचे विसर्जन
कल्याण : ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या...’ अशी विनवणी करत कल्याण आणि डोंबिवलीत शनिवारी १४ सार्वजनिक तर सात हजार ४२५ घरगुती गणपतींचे तसेच दोन हजार ६३० गौरार्इंचे विधिवत विसर्जन झाले. गणेश चतुर्थीला सोमवारी घराघरामध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. त्यापाठोपाठ गुरुवारी माहेरी आलेल्या गौरार्इंचे माहेरवाशिणींनी मनोभावे पूजाअर्चा केली. शुक्रवारी परंपरेनुसार गौरी पूजन आणि नैवेद्य दाखवण्यात आला. गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी घराघरांमध्ये आलेल्या पाहुण्यांमुळेही सर्वत्र मंगलमय वातावरण व उत्साह होता. या गौरी-गणपतींना शनिवारी भाविकांनी निरोप दिला.
विसर्जनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने विद्युत व्यवस्था, आरतीसाठी टेबले आदींची व्यवस्था केली होती. पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेने डोंबिवलीतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, शिवम हॉस्पिटल-कल्याण रोड, टिळकनगर विद्यामंदिर, अयोध्या नगरी मैदान, सम्राट चौक आनंद नगर, भागशाळा मैदान, नेरूरकर रोड, आयरे गाव पाण्याच्या टाकीजवळ, न्यू आयरे रोड, स्वामी विवेकानंद शाळा, संगीतावाडी, सावरकर उद्यानाजवळ येथे कृत्रिम तलाव उभारले आहेत. महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार भाविकांनी मोठ्या संख्येने या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
त्याचबरोबर जुनी डोंबिवली, रेतीबंदर गणेश घाट, कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाट अशा मोठ्या विसर्जन स्थळांसह खंबाळपाडा, संदप गाव, चोळेगाव, एमआयडीसी, कचोरे, खोणी, आधारवाडी, गौरीपाडा, गोविंदवाडी, रेतीबंदर आदी परिसरातील तलाव, खदाणी, विहिरी येथेही मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. दरम्यान, विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरांतील नाक्यानाक्यावर आणि खाडी परिसरात मोठा पालीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी जादा कुमकही तैनात करण्यात आली होती.