कागल : पुणे-बंगलोर महामार्गावर कुलकर्णी पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास माल वाहतूक ट्रक आणि क्वालिस गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार महिला भाविक जागीच ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाले. मृत वसई-विरार परिसरातील असून, देवदर्शनासाठी मायाक्का चिंचली (कर्नाटक) येथे निघाले होते. यशोदा राऊत (वय ५२), आदिका तांदळे (४५), गिरीजाबाई येरकर (६१), सखुबाई कोकरे (४६, सर्व रा. नवापूर, विरार, ता. वसई) अशीठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तानाजी घुटुकडे (४०, मूळ गाव कटफळ, जि. सोलापूर, सध्या रा. नवापूर, जि. ठाणे), वनीता घुटुकडे (३७, रा. नवापूर), कांता कोकरे (६६, रा. कळंब, जि. ठाणे), राकेश भोईर (३७, रा. अर्नाळ, ता. वसई), जगन्नाथ भोईर (३५, रा. विरार, ता. वसई), सुमन गोरड (३७, रा. नवापूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ट्रकचालक जयप्रकाश राजू (रा. जि. नामकल्ल, तमिळनाडू), के. मोहनकुमार (रा. पटराईगार्ड, तमिळनाडू) हे दोघेही जखमी आहेत. राकेश भोईर हा क्वालिस कार चालवित होता.
कागलजवळ भीषण अपघात; चार महिला ठार, सहा जखमी
By admin | Updated: February 6, 2015 23:09 IST