‘फास्ट’ होतेय स्लो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:45 AM2018-05-27T06:45:13+5:302018-05-27T06:45:13+5:30

रेल्वेची लांब पल्ल्यांची, मालगाड्यांची वाहतूक जलदगतीने व्हावी, त्यांच्या वाहतुकीतील लोकलचा अडथळा दूर व्हावा, उत्पन्न वाढावे, यासाठी पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातील कुर्ला-ठाणे आणि दिवा-कल्याण हे दोन टप्पे पूर्ण झाले. पण, दिवा-ठाणे हा टप्पा प्रचंड रेंगाळला आहे.

 'Fast' is Slow! | ‘फास्ट’ होतेय स्लो!

‘फास्ट’ होतेय स्लो!

Next

- मिलिंद बेल्हे

रेल्वेची लांब पल्ल्यांची, मालगाड्यांची वाहतूक जलदगतीने व्हावी, त्यांच्या वाहतुकीतील लोकलचा अडथळा दूर व्हावा, उत्पन्न वाढावे, यासाठी पाचवा आणि सहावा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातील कुर्ला-ठाणे आणि दिवा-कल्याण हे दोन टप्पे पूर्ण झाले. पण, दिवा-ठाणे हा टप्पा प्रचंड रेंगाळला आहे. कुर्ला ते मुंबई हा टप्पा परळला संपवावा की त्यापुढे न्यावा, यावर काथ्याकूट सुरू आहे. वर्षानुवर्षे हे प्रकल्प रेंगाळल्याने त्यांचे महत्त्व संपते आणि उपयोगिताही घटते. तशीच काहीशी अवस्था दिवा-ठाणे मार्गाची झाली आहे. प्रशासकीय मंदगती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा हा परिणाम आहे. यातून रेल्वे वाहतूक फास्ट करण्याचे सारे प्रयत्न कसे स्लो झाले आहेत, त्याचा धांडोळा...

ठाण्याच्या पुढील उपनगरी रेल्वेचा पट्टा हा कायमच उपेक्षित राहिला आहे. उपनगरी रेल्वेच्या ७५ लाख प्रवाशांपैकी जवळपास निम्मी प्रवासी संख्या असलेला हा पट्टा. या भागात दोनतीन मेट्रोमार्गांचे गाजर दाखवण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ठाणे ते दिवा या सध्याच्या चौपदरीमार्गाचे सहापदरीकरण करण्याची योजना मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) दुसऱ्या टप्प्यात होती. आता तिसºया टप्प्याची कामे सुरू झाली, तरी हा टप्पा मार्गी लागताना दिसत नाही. कल्याण ते आसनगावदरम्यान तिसरा मार्ग टाकण्याचे काम मार्गी लागलेले नसतानाच चौथ्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. आसनगाव ते कसारा आणखी एक मार्ग टाकला जाणार आहे. कल्याण ते कर्जतदरम्यान तिसरा मार्ग टाकण्याचे काम मार्गी लागण्यापूर्वीच कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या मार्गालाही मंजुरी मिळाली आहे. दिवा, ठाकुर्ली की कल्याण या टर्मिनसच्या वादावर तोडगा काढून ठाकुर्ली पॉवर हाउसच्या जागेतून उड्डाणमार्गावरून कल्याणला लांब पल्ल्यांची वाहतूक नेण्याचे आणि कल्याण यार्डाच्या जागेचा वापर करून तेथील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक वेगळी करण्याचे नियोजनही एमयूटीपीच्या तिसºया टप्प्यात आहे. कल्याणहून टिटवाळा-खडवलीमार्गे मुरबाडला लोकल नेण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. पनवेल-कोपर-वसई-विरार या मार्गावर पार डहाणूपर्यंत लोकल वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावर सध्या १३ रेल्वेस्थानके आहेत. त्यात आणखी ११ ची भर पडणार आहे. कल्याणहून वाशी, नेरूळ, उरण, पनवेलला जाण्यासाठी ठाण्यात उतरावे लागू नये, यासाठी कळवा-ऐरोलीदरम्यानच्या उड्डाणमार्गाचे कामही हाती घेतले आहे.
या साºया प्रकल्पांची घोषणा होऊन दीर्घकाळ उलटला. यातील कुर्ला-दिवा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तर गेले दशकभर वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. त्याची मुदत अनेकवेळा पुढे नेण्यात आली. हे काम पुढच्यावर्षी पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. पण, त्याला अजून दोन वर्षे लागतील, असे रेल्वेचे अधिकारीच सांगत आहेत. एक तर हा मार्ग सलग-सरळसोट नाही. ठाण्याहून विटाव्यापर्यंत पश्चिमेला त्याचे दोन मार्ग असतील. त्यापुढे ते कळव्यात पुन्हा पूर्व दिशेला जातील. (कळव्यातील याच मार्गाला जोडून ऐरोलीचा उड्डाणपूल असेल.) तेथून मुंब्य्रापर्यंत बोगदा ओलांडून ते गेले की, बायपासच्या पुलापासून ते मार्ग पुन्हा मुंब्रा पश्चिमेला जातील आणि तेथून दिव्यापर्यंत सलग पश्चिमेला असतील. जशी जागा उपलब्ध आहे, त्यानुसार या मार्गांची आखणी केली आहे. त्यामुळे तेथील जागासंपादन झाले. पण, जसजसे ट्रॅकचे (लोहमार्गाचे) काम होईल, तसतसे सध्याचे मार्ग बदलून ते सलग जोडत न्यावे लागतील. हे काम वेळखाऊ तर आहेच, पण त्यातून येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सध्याची वाहतूक विस्कळीत होत जाईल. मुंब्रा, कळवा येथे या कामासाठी दोनदोन जादा फलाट, पुलांचे काम सुरू आहे. कळवा स्टेशन ओलांडले की, लगेचच लागणाºया रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. तेथून खारीगावपर्यंत दोन पादचारी पुलांचे काम सुरू आहे. मुंब्रा येथे एक बोगदाही बांधून तयार आहे. चेंदणी कोळीवाडा भागात- पूर्वीच्या सिडको स्टॉपच्या पट्ट्यापासून विटाव्यापर्यंत रस्ते-खाडीवर पूल बांधले गेले आहेत. त्यालगत आता भरावाचेही काम सुरू आहे. मुंब्रा-रेतीबंदर भागातील रहिवाशांसाठी रेल्वेखालून मार्ग आहेच. पण, आता तेथे पादचारी पुलाची मागणी सुरू आहे. आता यातील काही कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचा साक्षात्कार रेल्वेला झाल्याचे सांगण्यात येते. त्यातही खासकरून मुंब्रा येथे बांधलेल्या बोगद्याची दिशा चुकल्याने तो पुन्हा बांधावा लागेल, असे सांगितले जाते. त्यामुळे हे मार्ग- फलाट बांधणे, त्यांच्या ओव्हरहेड वायरपासून सिग्नल यंत्रणेपर्यंतची सर्व कामे करणे, त्यातून सध्याच्या धीम्या गतीच्या मार्गांची रचना, फलाट बदलणे, पुढे सुरक्षा चाचण्या या साºया सव्यापसव्यातून पुढील दोन वर्षे तरी प्रवाशांची सुटका नाही. त्यामुळे खासकरून सध्याच्या जलद मार्गावरून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने येणाºया प्रवाशांना पारसिक बोगदा ओलांडला की, सध्या लांब पल्ल्याची गाडी, मालगाडी मार्ग ओलांडत असेल, तर ठाणे स्थानकात शिरताना दीर्घकाळ थांबावे लागते. तोच प्रकार दिवा स्थानकाजवळही होतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचावा, म्हणून जलद मार्गाने येणाºयांचा हिरमोड होतो.
यासाठी खरेतर या कामाचे वेगवेगळे टप्पे करून ती कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. तसे ते झालेही. परंतु, गेल्यावर्षी आणि यंदाही जवळपास तीनतीन महिने काम पूर्णत: ठप्प झाल्याने त्याचा वेग मंदावला. सध्याची त्यांची गती पाहता हे मुख्य काम-त्यातील अभियांत्रिकी कामेच वर्षभर चालतील, असा रेल्वेच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. त्यामुळे त्यानंतर उरलेली तांत्रिक कामे पूर्ण करून या मार्गांवरून वाहतूक सुरू व्हायला आणि त्याचा सध्याच्या वाहतुकीला दिलासा मिळायला किमान दोन वर्षे जातील. त्यानंतर, उपनगरी गाड्या वाढणे, त्यांच्या फेºया वाढणे, गती वाढणे आणि सध्याच्या फेºयांचे फेरनियोजन करणे, हे टप्पे पार पडून त्यानंतर सारे बदल प्रत्यक्षात येण्यास आणखी काळ जाईल.
हा झाला, रेल्वेच्या एका टप्प्याचा प्रवास. पण, उरलेल्या मार्गवाढीचे, यार्डांचे, उड्डाणपुलांचे, ठाकुर्ली-कल्याण टर्मिनसचे प्रकल्प कधी पूर्ण होतील, याचे वेळापत्रक रेल्वेने जाहीर केलेले नाही. ढोबळमानाने त्याला दोन वर्षे लागतील, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे लोकलने प्रवास करणाºयांचे हाल लवकर संपण्याची शक्यता नाही. पण, तोवर ‘आम्ही दिलगीर आहोत’ हे रेल्वेचे पालुपद ऐकायला मिळेलच!

 

जलद गाड्यांमुळे यापुढे
वेळ वाचणे कठीणच
सध्या मुंबईला जाणारी लोकल दिव्याहून पुढे पारसिक बोगद्यातून जात असल्याने ठाण्याला पोहोचेपर्यंत जलद गाडीची साधारण सात ते आठ मिनिटे वाचतात. त्याचा चांगला परिणाम मुंबईत पोहोचण्याच्या वेळेवर होतो. पण, दिवा-ठाणेदरम्यानचे दोन जादा मार्ग पूर्ण झाले की, लोकल स्लो असो की फास्ट, त्या सर्व गाड्या दिवा, मुंब्रा, कळवामार्गेच जातील. पारसिक बोगद्यातून जाणारे सध्याचे दोन्ही मार्ग लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि मालगाड्यांसाठी राखून ठेवले जातील. अनेक जलद गाड्यांना सध्या दिव्याचा थांबा दिल्याने जलद गाडीच्या प्रवासाच्या वेळेत दोन मिनिटांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काळात लोकल मुंब्रा, कळव्यात थांबली नाही आणि काही गाड्या दिव्यात थांबल्या नाहीत, तरी फास्ट आणि स्लो गाड्यांच्या वेळेत फारतर तीन मिनिटांचा फरक पडेल. त्यामुळे काही स्थानकांत गाडी थांबली नाही, म्हणून जो वेळ वाचेल, तेवढाच जलद गाडीच्या प्रवाशांच्या पदरी पडेल. सध्या डोंबिवली ते मुंबईदरम्यान जलद आणि धीम्या गाडीच्या प्रवासात किमान २० मिनिटांचा फरक पडतो. पुढील काळात तो १२ ते १४ मिनिटे इतका कमी होईल, असा सध्याचा अंदाज आहे.

पर्यावरण परवानगी : काही डावे-काही उजवे
ठाण्यापुढील भागाला खासकरून डोंबिवलीपर्यंत रस्तेमार्गाचा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला, तर रेल्वेवरील ताण खूप कमी होईल, हे वेगवेगळ्या अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. त्यासाठी डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर रेल्वेला समांतर रस्त्याने जोडणे गरजेचे आहे. पण, त्याला पर्यावरण परवानगी मिळत नाही, हा मुख्य अडसर असल्याचे सांगितले जाते आणि त्यामुळेच वेगवेगळी सर्वेक्षणे होऊनही तो मार्ग व्यवहार्य ठरलेला नाही. पण, आता अशाच काही भागांतून जाणाºया बुलेट ट्रेनला पर्यावरणाचा ना हरकत दाखला मिळतो. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाला तो मिळणार, हेही स्पष्ट आहे. मुलुंड-गोरेगाव मार्गासाठी संजय गांधी उद्यानातून पूल टाकला जाणार आहे; पण त्याला पर्यावरणाचा अडथळा येत नाही, हा किती विरोधाभास आहे. राजकीय नेतृत्व कमकुवत असले, त्यांचा अभ्यास नसला की, प्रशासकीय यंत्रणा त्याचा कसा गैरफायदा उठवतात, त्याचे हे उदाहरण आहे. या प्रश्नावर उतारा म्हणून बांधल्या जात असलेल्या डोंबिवली (मोठागाव ठाकुर्ली) ते पिंपळास पुलाचे काम अर्धवट पडले आहे. डोंबिवलीहून रेल्वेला समांतर रस्त्याने मुंब्रामार्गे ठाण्यात जाणे सोयीचे की, डोंबिवलीहून कोनजवळ (पिंपळास) जाऊन पुन्हा मुंबई-नाशिक महामार्गाच्या कोंडीत सापडून ठाण्याला जाणे सोयीचे, असा प्रश्न विचारला की, वेगवेगळे विभाग दुसºयाकडे बोट दाखवतात.  

        milind.belhe@lokmat.com

Web Title:  'Fast' is Slow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.