गृहपाठ - शिक्षकांची बदलती पंचसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:47 PM2019-09-05T23:47:27+5:302019-09-05T23:47:46+5:30

संतोष सोनावणे

Changing pentameter of teachers | गृहपाठ - शिक्षकांची बदलती पंचसूत्री

गृहपाठ - शिक्षकांची बदलती पंचसूत्री

Next

संतोष सोनावणे

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून आजच्या जागतिकीकरणाच्या युगातील शैक्षणिक बाजारपेठांपर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गुरू, आचार्य, अध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा संज्ञा बदलत राहिल्या, परंतु शिक्षकाचं स्थान आजही अढळ आहे. बदललं ते शिक्षकाच्या कामाचं स्वरूप, शिकवण्याच्या पद्धती, शिक्षणाची साधनं. अर्थात, शिक्षकालाही तसा बदल स्वीकारणं व कार्यान्वित राहणंही अपरिहार्य आहे.

आज माहितीचे अक्षरश: जाळे तयार झाले आहे. एका क्लिकवर जग जवळ आले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे खरंच क्रांती घडू पाहत आहे. अशा या वेगवान जगात त्याच वेगात स्वत:ला ठेवणं हे कठीण वाटत असलं, तरी अवघड मात्र निश्चित नाही. एके ठिकाणी माझ्या वाचनात आलं होतं की, शिक्षक म्हणजे टेक्स्टबुक टू नोटबुक. खरं म्हणजे, अशी मर्यादा शिक्षकपदाला तिथेच थांबवते. शिक्षकाने स्वत:ला कधीही अभ्यासक्र म, पाठ्यपुस्तक व परीक्षा या चक्रात बसवू नये. एकदा का आपल्या कामात साचेबंदपणा आला की, नवनिर्मिती, सृजनशीलता, प्रयोग हे आपोआपच थांबते. एका अर्थाने खरोखर एखाद्या कलावंताप्रमाणे शिक्षक जन्मावा लागतो. एकदा का तो जन्मला की, सुरू होते ती साधना, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि परिश्रम. परंतु, याकरिता स्वत:ला सतत विद्यार्थी समजणं आणि त्याच ध्यासाने सतत शिकत राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याकरिता पुढील पंचसूत्रीचा अवलंब करावयास हवा.
१) आपल्या विषयावरची हुकूमत : जो विषय माझा आहे, माझ्या आवडीचा आहे, त्याचा व्यासंग हवा, त्यावर प्रभुत्व हवं. यात केवळ शालेय विषयच येतील, असे काही नाही तर ते ते सगळे विषय जे विद्यार्थीहित, समाजहित, राष्ट्रहित जपतात, त्यांचा यात समावेश होईल. आपल्या विषयाचा खोलवर अभ्यास हवा. वाचन हवं. आपल्या विषयाची कुठे चर्चा झाली तर आवर्जून आपले नाव यायला हवे. मनात ध्यास घेतला तर ते निश्चित शक्य आहे.
२) शिकविण्याचे / अध्यापनाचे कौशल्य : विषयाचा केवळ व्यासंग हा आपल्याला अभ्यासू किडा बनवून टाकतो. आपला विषय अधिक रंजकपणे दुसऱ्याच्या वयाचा विचार करून त्याला समजेल, अशा भाषेत त्याच्या गळी उतरवणे हे आहे खरे कौशल्य. यासाठी हवा सराव व उत्कृष्टतेचा ध्यास.
३) अद्ययावतता : शिक्षण क्षेत्रात होणारी विविध संशोधने, बदलत्या घडामोडी, होणारी स्थित्यंतरे, नवीन विषयप्रवाह याकरिता स्वत: नेहमी भुकेले राहणे गरजेचे आहे. आजचे ज्ञान हे उद्या जुने व कालबह्यहोत आहे. मला उद्यासाठी आज तयारी करायलाच हवी, ही काळाची गरज आहे, हे जाणणे गरजेचे आहे.
४) वाचन व लिखाणात नियमितता, सातत्य : वरील तिन्ही तंत्रांकरिता सातत्याने वाचन व लिखाण करावयास हवे. विद्यार्थ्यांनी हजेरी, टाचण वही व अहवाल लेखन यात स्वत:ला बाहेर काढायला हवे. जसे आपण वाचतो, तसे आपण विचार करतो, तसे आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. वाचन-लिखाणाने विचारात प्रगल्भता येते.
५) विद्यार्थ्यांवरील नि:स्वार्थ व निर्व्याज प्रेम : वरील चारही तंत्राच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे हे तंत्र आहे. मुलांच्या चेहºयावरचा आनंद शोधणारा, शिकविताना ज्याचे अंत:करण भरून येते, कधी कधी त्याचा गळा दाटून येतो, हेच माझे काम व हेच माझे समाधान असे मानणारा खरा शिक्षक. मुलांना सतत प्रेरणा देणारा, जगण्याचं बळ देणारा व उंच आकाशात भरारी घेण्यासाठी उभारी देणारा शिक्षक व्हायला हवे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी कालच शिक्षक दिन साजरा केला गेला. एक व्यासंगी शिक्षणतज्ज्ञ हा देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. मात्र आज जगाने खूप वेग घेतलाय, ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्यात, अशावेळी शिक्षकांनीही स्वत:ला अधिक सक्षम व अद्ययावत ठेवणं काळाची गरज बनली आहे.
 

Web Title: Changing pentameter of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.