मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-डोंबिवली दरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका चाकरमान्यांना बसतो आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून कल्याणहून जाणाऱ्या लोकल गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कटलं आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेनं प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास उशिरानं सुरू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर सीएसएमटीहून कल्याणकडे जाणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक नेमकी कशामुळे खोळंबली, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या अर्धा तास उशिरानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 08:40 IST