रिलायन्स जिओने भारतात टेलिकॉम सेवा सुरु करून ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कंपनीने पहिल्यांदा फोरजी लाँच करत आधीपासून दादागिरी करत असलेल्या सर्व कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. आता रिलायन्स जिओ या क्षेत्रातील दादा झाली असून रिचार्ज प्लॅन वाढवत चालली आहे. अशातच जिओ कंपनीने ९ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने तसेच ५० कोटी ग्राहकांचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन सुरु केले आहे.
या अंतर्गत जिओ आपल्या युजरना कोणताही प्लॅन असला तरी ३ दिवसांचा अनलिमिटेड डेटा देणार आहे. तसेच ज्या ग्राहकांकडे ४ जी फोन आहे त्यांनाही ३९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा देणार आहे.
५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या विकेंडला जिओ तीन दिवस अनलिमिटेड फाईव्ह जी इंटरनेट देणार आहे. ज्या ग्राहकांनी ४जी रिचार्ज केले आहे व ज्यांच्याकडे ५जी फोन आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर १२०० रुपयांमध्ये २ महिन्यांचे नवीन जिओहोम कनेक्शन दिले जाणार आहे. यामध्ये १०००+ टीव्ही चॅनेल, ३० एमबीपीएस अमर्यादित डेटा, १२+ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन (जिओहॉटस्टार + इतर), ४के स्मार्ट सेट टॉप बॉक्स आदी दिले जाणार आहे.
एवढेच नाही तर ज्या ग्राहकांनी गेले १२ महिने सलग ३४९ रुपयांचे रिचार्ज केलेले आहे, त्यांना १३ वा महिना मोफत दिला जाणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात या ग्राहकांना ३४९ चे ५जी अनलिमिटेड प्लॅनसाठी रिचार्ज करावे लागणार नाहीय.