आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राज्यामध्ये सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना पुरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करावी असे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद म्हणून तसेच मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीकडून पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट व लाडूप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सद्यस्थितीत, पंढरपूर शहर व परिसरात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मंदिर समिती प्रत्येकवेळी पंढरपूर शहरातील स्थानिक पुरग्रस्त नागरिकांना फुड पॅकेट वाटप करीत असते. यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. जिल्ह्यात सीना, भीमा नदीला महापूर आला आहे. शेकडो गावांना पाण्याने वेढा घातला आहे. सहा तालुक्यातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक लोकांना एनडीआरएफच्या पथकाने मदत केली आहे.