ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी या मुंबई येथील भारतीय मर्चंट नेव्ही कंपनीचे जहाज ऑस्ट्रेलिया येथून कोळसा सप्लाय करण्यासाठी चीन येथील बंदराजवळ गेल्यानंतर चीन सरकारने कोळसा स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे तब्बल गेल्या ५ महिन्यांपासून हे जहाज व भारतातील २३ अधिकारी व कर्मचारी अडकून पडलेले होते. यात पंढरपूरचे सुपुत्र वीरेंद्रसिंह भोसले हेही होते. त्यांच्या जवळचा औषध-गोळ्यांचा साठा संपत आलेला असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता देखील ढासळत चाललेली होती. या सर्वांची सुटका करण्यासाठी वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देऊन सोडवणूक करावी, अशी विनंती केली होती.
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जी २०, जी ७ चे शेरफा सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधत चीनमध्ये अडकलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले. यावर सुरेश प्रभू यांनी तत्काळ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत सूत्रे हलविली. त्या प्रयत्नांना यश आले असून, आठ दिवसात हे अधिकारी मायदेशी परतणार असल्याचे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
----