Viral News : रील बनवण्यासाठी सध्याची तरुणाई काहीही करत आहे. जंगल, नदी, धबधबे कुठे जाऊन रील बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. झारखंडमध्ये काही तरुण रील बनवण्यासाठी जंगलात गेले होते. या तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी आहेत. या तरुणांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झारखंडमधील कोडरमा येथे तरुणांना रील बनवणे जीवाशी बेतले आहे. कोडरमा जिल्ह्यातील चांदवाडा येथे ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी चांदवाडा ब्लॉकमधील चौराही गावातील काही मुले आणि मुली जंगलात रील शूट करत होते. या दरम्यान, झाडाची फांदी तोडल्यानंतर मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
टीममधील सहाही जण इकडे तिकडे पळू लागले. दोघांनी स्वतःला वाचवण्यात यश मिळवले पण मधमाश्यांनी चार मुलांना आणि मुलींना घेरले आणि त्यांना चावू लागले.
या हल्ल्यात चार जणांना त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मधमाश्यांनी चावा घेतला. यानंतर, चौघांना झुमरी तिलैया येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. दोन जणांनी सांगितले की, झाडाची फांदी तोडताना मधमाश्यांनी हल्ला केला. त्यांच्याकडे कॅमेरे आणि इतर वस्तू होत्या ते जंगलात अडकले होते आणि ते पळून जाऊ शकले नाहीत.