सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची स्थिती बिकट आहे. वीज वितरणच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीच्या काही अभियंत्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच झाडाझडती घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखत जोराचा ‘शॉक’ दिला. जिल्हाधिकारी भवनातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील विजेच्या संबंधी चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित असल्यामुळे सभागृहात उभे रहायलाही वाव नव्हता. सुमारे दहा वर्षानंतर पहिल्यांदा विस्तृत असा विजेच्या समस्यांविषयी आढावा घेण्यात आला. वीज वितरणच्या सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उर्जामंत्री बावनकुळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सर्वांना रांगेत उभे करून प्रलंबित कामांची चौकशी केली. अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणात संशय वाटल्यास उर्जामंत्री बावनकुळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला, सचिवांना भ्रमणध्वनीमार्फत फोन करून ‘त्या’ कामासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. एखाद्या कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा आढळल्यास प्रसंगी निलंबित किंवा सेवा समाप्तीही करू, अशी तंबी मंत्री बावनकुळे यांनी दिल्याने अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. कधी नव्हे ते जिल्ह्यातील वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी ड्रेसकोडमध्ये दिसत होते. तसेच जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात अनियमितता व हलगर्जीपणा केल्यामुळे ‘त्या’ तिघाही अधिकाऱ्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखा, असे आदेशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून दिले. या जिल्ह्यात ग्राहकांकडून थकबाकी कमी प्रमाणात आहे तरीसुद्धा जनतेला चांगल्याप्रकारे सेवा मिळत नाहीत. महावितरण, महापारेषण जनतेला चांगल्या सेवा देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात २ हजार मेगावॅट वीजसाठा उपलब्ध आहे. वीजेची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. मात्र हा वीजपुरवठा वितरीत करण्यासाठी मजबूत प्रकारे जाळे उपलब्ध नसल्याने कित्येक ग्राहकांना वीज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचीही कित्येक कृषी पंपांना वीज जोडणी देणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. या आत्महत्यांना वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री बावनकुळे यांनी केला.
तीन अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली
By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST