राजेश जोष्टे - खेर्डी --चिपळूण शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी क्रॉफर्ड या मुंबईस्थित ब्रिटिश गव्हर्नरने शतकापूर्वी बांधलेले धरण ओसंडून वाहात असून, इतक्या वर्षांपूर्वी इथूनच ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होत होता. या धर्तीवर पूरमुक्ती व जलव्यवस्थापन असा दुहेरी हेतू साध्य होण्यासाठी कोकणात प्रसंगी छोटी पण पक्क्या स्वरुपाची धरणे बांधावीत, असा मतप्रवाह जोर धरत आहे. ब्रिटिश गव्हर्नरने पेण आणि चिपळूण येथे छोटी धरणे बांधून घेतली. चिपळुणात कामथे - कापसाळ येथे शीवनदीवर हे धरण बांधण्याची योजना १८७९मध्ये मंजूर झाली होती. या धरणासाठी मोठ्या जमीनदारांनी देणगी दिल्या. विशेष म्हणजे धरण बांधकामाला खर्च थोडा आला तर शहरभर पाईपलाईन फिरवण्यासाठी त्याकाळी साडेचार लाख रुपये खर्ची पडले. एवढी जुनी नळपाणी योजना राज्यात क्वचितच अन्य ठिकाणी सापडेल. १९१०च्या सुमारास ही योजना सुरु झाली होती. ती अव्याहतपणे १९६७ पर्यंत सुरु होती. कोयनेचे धरण बांधल्यानंतर मात्र चिपळूणला वाशिष्ठी नदीतून पाणी पुरवठा होऊ लागला असून आजही तो कायम आहे.चिपळूण नगर परिषद १३६ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असल्याने त्या काळात दोन सुरक्षारक्षकही जलसाठ्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी नगर परिषदेने उचलण्यास सुरुवात केल्यानंतर गेल्या ४८ वर्षे या धरणाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, तो गाळाने होरला होता. पाटबंधारे खात्याने त्यातील काही गाळ काढला असला तरी हे काम परिपूर्ण झाले नाही. असे असले तरी आजही हे धरण मजबूत स्थितीत आहे. त्याचे स्थापत्यशास्त्र देखणे असल्याने पर्यटक, प्रवासी पावसाळ्यात त्यांच्या विहंगम परिसराचा आनंद घेतात. देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत व राज्यात होणाऱ्या एकूण पर्जन्यवृष्टीपैकी ४६.५ टक्के पाणी एकट्या कोकणात पडते. पण धरणांची मोठी संख्या कोकणवगळता उर्वरित राज्यात आहेत.
कोकणातील पाण्यावर क्रॉफर्ड उतारा फायद्याचा
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST