आचरा : जिल्ह्यातील होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थंडावले असे वाटत असतानाच वायंगणी येथील आचरा-मालवण मार्गावर असलेल्या स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळविली. या दानपेटीतील सुमारे आठ ते नऊ हजारांची रोख रक्कम लंपास करत ही दानपेटी मंदिरापासून २00 फुटांवरील अंतरावर एका झाडीत फेकून दिली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. वायंगणी येथील स्वामी समर्थ मठातील दानपेटी चोरट्यांनी पळवून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मठातील पुजारी रूपेश राणे हे शनिवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी लागलीच मठाच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांना दूरध्वनीद्वारे कळवून हे निदर्शनास आणून दिले. चोरीचे वृत्त समजताच आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या वृत्ताने स्वामीभक्तही मठाकडे धाव घेत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले मठाच्या मंडळाचे बाबू हडकर, सदा राणे, हरीष निंबाळकर, प्रमोद सावंत, बाळा राणे, आदींनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मठापासून सुमारे २०० फुटांच्या अंतरावरील झाडीत दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. चोरट्यांनी या मठाची पूर्णत: पाहणी करूनच नंतर चोरी केल्याचे निदर्शनास येत होते. या घटनेचा तपास आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. कोचरेकर व पी. एच. नाईक करीत आहेत. (वार्ताहर) ४० किलो वजनाची पेटी पळविली वायंगणी स्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागातील बंदिस्त लोखंडी दरवाजाला असणारे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत साखळीने बांधलेली ४० किलो वजनाची दानपेटी लंपास केली. लॉकर स्वरूपाची असल्याने चोरट्यांनी पेटीच पळवून नेऊन रानमाळावर फोडल्याचे दिसून येत होते.
वायंगणीत दानपेटी पळवून रोकड लंपास
By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST