कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसोली कुत्रेकोंड कॉजवेवरून जाताना पुलाच्या काठावरुन दुचाकी पुराच्या पाण्यात गेल्याने दुचाकीस्वार अमित मोहन धुरी (३०, माणगाव धरणवाडी) हा वाहून गेला.तर मागे बसलेला त्याचा सहकारी सखाराम कानडे (६२, माणगाव डोबेवाडी) सुदैवाने बचावला. एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या युवकाचा मंगळवारी दिवसभर शोध सुरू होता. रात्री उशिरा जास्त पावसामुळे नदीला पूरस्थिती असल्याने शोध मोहीम स्थगित करण्यात आली.कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात गेला आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे कर्ली नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाली आहे. सोमवारी सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे कठडा नसलेल्या वसोली कुत्रेकोंड कॉजवेवर पाणी आले होते.त्याच दरम्यान माणगांव येथून दुचाकीने अमित धुरी आणि सखाराम कानडे हे दोन युवक शिवापूरला जात होते. वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी कॉजवेवरील पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री कॉजवे वरील पाण्याचा अंदाज नआल्याने दुचाकी पुलाच्या काठावरुन पुराच्या पाण्यात गेली. त्यात अमित धुरी हा वाहून गेला, दुचाकीवर मागे बसलेला सखाराम कानडे याने काठावरील झाडाला धरल्याने तो बचावला.
गाडी जाणार नाही सांगूनही..कॉजवेवर पाणी असल्यामुळे गाडी जाणार नाही, असे सखाराम कानडे याने अमित धुरी याला सांगितले मात्र पाणी कमी आहे आपली गाडी जाऊ शकते असे अमित याने सखाराम कानडे यांना सांगितले व आपल्या ताब्यातील गाडी काॅजवेवरील पाण्यातून अमितने घातली, मात्र काॅजवेवर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अमितचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही गाडीसह काॅजवेवरच पडले. अमितचा गाडीचा हात सुटल्याने तो कॉजवे खाली गेला. त्या पाठोपाठ सखाराम कानडे काॅजवे वरील पाण्यात पडला.सुदैवाने सखाराम कानडेच्या हाताला नदीपात्रातील झाड लागल्याने तो आधार पकडून तो काठावर आला.तर अमित वाहुन गेला, असे सखाराम कानडे यांने सांगितले.
रात्रीची वेळ धावपळ पडली अपुरीबचावलेल्या सखाराम कानडेने घटनास्थळी धावपळ गेली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वसोली येथील दुकानावर धाव घेत झालेला घटनाक्रम ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर सर्वत्र फोनाफोनी व धावपळ सुरू झाली. पण रात्रीची वेळ असल्याने सर्वच यंत्रणांना मर्यादा आल्या.
कुडाळ तहसीलदार, पोलिस निरीक्षक रात्रीच घटनास्थळीसोमवारी रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेतून वाचलेल्या सखाराम कानडे याची त्यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.
जिल्ह्यात पावसाची संततधारदरम्यान, जिल्ह्यात गेले दोन दिवस अधूनमधून पावसाची संततधार सुरू असल्याने ग्रामीण भागातील अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.