उंब्रज : ‘यळकोट यळकोट जय मल्हार... सदानंदाचा यळकोट..’च्या गजरात श्री खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर शाही थाटात पार पडला. भंडाऱ्याची उधळण केल्याने अवघी पालनगरी न्हाऊन निघाली.महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या विवाह सोहळ्याकरिता मंगळवारी राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. भंडाऱ्याच्या उधळणीने श्री खंडोबाची पालनगरी पिवळी धमक झाली होती. दुपारी श्री खंडोबा देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील देवस्थानच्या रथामध्ये आसनस्थ झाले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. या रथाबरोबर देवस्थानचे पदाधिकारी, मानकरी, वऱ्हाडी मंडळी, कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा, मानाच्या सासनकाठ्या, पालखी आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मंदिरात आल्यानंतर मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी श्री खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्तींची पूजा करून सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसल्यानंतर लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या भाविकांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडारा, खोबऱ्याची उधळण केली.फुलांनी सजविलेल्या रथातून श्री खंडोबा आणि म्हाळसा यांची शाही मिरवणूक मंदिरातून बाहेर पडत हळूहळू पुढे सरकत दक्षिण दिशेकडील तारळी नदीपात्रातील वाळवंटात जाऊ लागली. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी चहू बाजूंनी ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं.. यळकोट यळकोट जय मल्हार..’ च्या गजरात भंडारा, खोबऱ्याची उधळण करत श्री खंडोबा आणि म्हाळसा यांची रथातून निघालेली शाही मिरवणूक याची देही याची डोळा अनुभवली.हरफळवाडी, काशीळ मार्गावरून येणारे भाविकांसाठी वाळवंटाकडे जाण्याचे पर्यायी मार्ग तयार करण्यात होते. यामुळे भाविक एका ठिकाणी न थांबता वाळवंटाकडे जात होते. यामुळे गर्दीवर नियंत्रण राहिले. (वार्ताहर)दर्शनबारीची व्यवस्था सोमवारपासूनच या विवाह सोहळ्यासाठी भाविक पाल येथे दाखल होऊ लागले होते. भाविकांना व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शनबारीची खास सोय केली होती. यात्रेकरूसांठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी उंब्रज, सातारा, कऱ्हाड, पाटण येथून एसटी महामंडळाने जादा बसची सोय केली होती. तर शिरगाव, हरपळवाडी मार्गावर खासगी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती. आपत्कालीन पथकांचा कडा पहारापोलिस प्रशासनाने मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिरापासून काही अंतरावर बॅरिकेटस लावण्यात आले होते. यामुळे मंदिर परिसर पूर्णता मोकळा झाला होता. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामक दलाची पथके, आरोग्य विभागाची पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. आत्पकालीन उपयोगासाठी पाल-वडगांव-इंदोली मार्ग पूर्णता मोकळा ठेवण्यात आला होता.
पिवळ्या भंडाऱ्यात रंगली पालनगरी..!
By admin | Updated: January 10, 2017 22:27 IST