पाचवड : पाचवड, ता. वाई येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या सहापदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यातच महामार्ग अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गावास पाणीपुरवठा करणारी जलवाहिन्या ठिकठिकाणी उद्ध्वस्त झाल्या आहे. पाचवड फाट्यावरील व गावामधील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीने ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे साथरोगाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात पाचवड गावास पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठिकठिकाणी तुटली आहे. या पाईपलाइनचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महामार्गाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाचवड गाव व फाट्याला होत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या एक महिन्यापासून पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावीत लागत आहे. तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असून, येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहचणार आहे. (वार्ताहर) सहापदरीकरणाचे काम बंद पाडणार... पाचवड ग्रामपंचायतीने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन याबाबतचे लेखी पत्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकऱ्यांना दिले आहे. पाचवड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचल्यास त्यास पूर्णपणे संबंधित अधिकारी जबाबदार राहणार असल्याचेही कळविले आहे. पाईपलाईनचे काम त्वरित करून द्यावे, अन्यथा सहापदरीकरणाचे काम बंद पाडण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
महामार्गाचे काम सुरू... जलवाहिन्या मात्र उद्ध्वस्त
By admin | Updated: October 31, 2015 00:09 IST