सातारा : वाढलेली झाडी, कचरा कुंडी म्हणून होणारा वापर, मृत जनावरे आणून टाकण्याचे ठिकाण म्हणून अलीकडे डीपी बॉक्स ठेवलेल्या जागांचा वापर होताना दिसत आहे. वीजवितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे गेल्या काही दिवसांत हे डीपी मृत्यूचा शॉर्टकट ‘आ’ वासून उभे असल्याचे धक्कादायक वास्तव शहरात पाहायला मिळाले. डीपी म्हणजे मृत्यूच्या जवळ नेणारे ‘डेथ पास’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. मंगळवारी शहरातील मंगळवार तळे परिसरात सोमनाथ ढेबे या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील डीपी आणि सामान्यांची सुरक्षितता याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरातील नागरिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून येथील डीपीचे दार लावण्याचीही तसदी कोणी घेत नव्हते. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील विविध भागांतील डीपींची अवस्था पाहताना अंगावर शहारे आले. कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय वीजवितरण कंपनीने या डीपींची उभारणी केली आहे. शालेय वयात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोडकरपणा असतो. आपल्या मित्रांमध्ये आपण ‘हिरो’ ठरावे, यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे पालकांनीही मुलांना धोक्याची समज देणे आवश्यक आहे. नित्यनियमाने मुलांचे होणाऱ्या अपघातांविषयी घरात मुलांशी चर्चा होणे आवश्यक असते. हा अपघात का घडला, त्यातील धोके काय होते, ते कसे टाळता आले, असते याविषयी जेवतानाही बोलणे शक्य आहे. घरांमध्ये मुलांना समजायला नको म्हणून अशा चर्चा होत नाहीत, त्यामुळे पुढील अनेक धोके संभवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कृती केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम मुलांना सांगितले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात. पालकांनीही बोलते झाले पाहिजे. (प्रतिनिधी) चक्क जाहिरातींसाठी वापर सातारा शहरात जुना आरटीओ रस्त्यावर एक वीजवितरणचा डीपी आहे. त्यावर चक्क जाहिराती लावण्यात आल्या आहेत. दुकानात काही आणण्याच्या निमित्ताने फूटपाथवरून जाणाऱ्या चिमुरड्यांच्या हाताला हा डीपी सहज येतो. डीपी वर चिटकवलेल्या जाहिरातीचा कागद फाडण्याच्या नादात जर लहानग्यांनी त्याला हात लावला तर मोठा अनर्थ घडू शकतो, असे येथील स्थानिक सांगतात. त्यामुळे येथे जाहिराती चिटकविण्यापेक्षा धोक्याची सूचना लिहिण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उघड्या फ्युजपेट्या शहरातील बहुतांश फ्युजपेट्या पत्र्याच्या आहेत. त्यांना कडी-कोयंडा नाहीत. या पेट्यांचा वापर चित्रपटांचे पोस्टर, जाहिराती चिटकविण्यासाठी केला जात आहे. हे चिटकवत असताना मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यामुळे या पेट्या बदलून त्याठिकाणी जाहिराती चिटकविण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
साताऱ्यातील डीपी बोले तो ‘डेथ पास’!
By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST