विशाल सूर्यवंशी-बुध खटाव तालुक्यातील राजापूर येथील पदवीधर तरुण मिलिंद शिवाजी कचरे या तरुणाने इच्छाशक्तीच्या जोरावर राजापूरच्या माळावर आज आपल्या कष्टातून यशाची फुले फुलवली आहेत़ दोन ग्रीन हाउसच्या माध्यमातून ऐन दुष्काळातही फूल शेतीतून आपली आर्थिक समृद्धी साधली आहे़ आज कचरे यांचे यश अन्य तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.कला शाखेची पदवी घेऊन नोकरीसाठी जीवाची मुंबई करून मिलिंद कचरे या तरुणाने गावाचा रस्ता धरला़ नोकरीमध्ये चाकोरीबद्ध काम करणे मनाला रुचले नाही़ मुंबई सारख्या शहरात काम करताना महिन्याच्या शेवटी काहीच रक्कम हाताला लागत नसल्याने गावाकडे शेती केलेली बरी, या हेतूने राजापूर येथील डंगारवाडा या परिसरात असणाऱ्या खडकाच्या माळरानावर शेती करण्याचा ध्यास मिलिंदने घेतला़ प्रथम माळारानातील खडक पोकलेनच्या साह्याने फोडून थोडेफार क्षेत्र तयार केले़ डोंगर उताराला क्षेत्र असल्याने पारंपरिक शेती करून म्हणावे तसे उत्पन्न पदरात पडणार नसल्याने वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा विचार मिलिंद कचरे या तरुणाच्या मनात येऊ लागला. त्यातूनच ग्रीन हाउस उभारण्याचा निर्णय घेतला़ २००९ मध्ये बँकेतून सहा लाखांचे कर्ज घेऊन कामाला सुरुवात केली़ ५६० चौरस मीटरच्या ग्रीन हाऊस उभारण्यास साडेतीन लाख रुपये खर्च आला. तर कार्नेशन झाडाची रोपे थेट केनियातून मागवली. त्यासाठी दीड लाखाचा खर्च आला़ या शेतीसाठी आवश्यक असणारी लालमाती टाकण्यासाठी जवळजवळ लाखभर खर्च करून या फूल शेतीच्या कामाला सुरुवात केली़ चार महिन्यांत उत्पन्न चालू झाले. या चार महिन्यांत झाडाची देखभाल, प्रत्येक झाडाला खत औषध, फवारणी आदी अगदी काटेकारपणे करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने मिलिंद कचरे यांनी हे सर्व काळजीपूर्वक केले़ चार महिन्यांतच जवळजवळ ५० हजार फुलांचे उत्पन्न मिळाले. मुंबई फूल मार्केटला प्रतिफूल ८ रुपयांप्रमाणे भाव मिळाल्याने फक्त ९ महिन्यांत ४ लाखांचे भरघोस उत्पन्न मिळाल्याने मिलिंद यांच्या कष्टाला चांगले यश आले़ दरवर्षी साधारण सहा लाखांची उलाढाल होत होती़ सर्व कर्ज फेडून मिलिंद यांनी सुमारे ७ लाख रुपये शिल्लक ठेवले. त्यातून याच ग्रीन हाउसच्या शेजारी १५ गुंठ्यांचे नवीन ग्रीन हाउसचे शेड उभारले. त्यासाठी पुन्हा थोडेफार कर्ज आणि शिल्लक यातून फूल शेती मोठ्या प्रमाणात करण्याचे धाडस केले. या शेतीच्या माध्यामातून मिलिंद कचरे या तरुणाने आपली आर्थिक प्रगती साधली आहे. या ग्रीन हाउसमध्ये जरबेरा, ग्लॅडियेटर, शेवंती, गुलाब, लिमोनियम हे फूल पीक घेतल्याने जमिनीचा दर्जा चांगला राहत आहे. खर्च जाऊन ५० हजार रुपये मिळत आहेत. दर दोन दिवसांला मुंबई मार्केटला काही माल तर राहिलेला आपल्याच परिसरात देऊन मिलिंद कचरे यांनी समतोल साधला आहे़ या कामी त्यांना पत्नी माधुरी यांच्यासह कुटूंबियांची साथ लाभत असल्याचे मिलींद यांनी सांगीतले.शेततळ्यावर फूल शेती तग धरून...भविष्यात याच माळरानात कृषीपर्यटन हा प्रकल्प उभा करण्याचा मानस मिलिंद कचरे यांचा आहे. त्यासाठी आतापासूनच त्यांनी सुरुवात केली आहे. तसेच यावर्षी मोठा दुष्काळ असतानाही मिलिंद कचरे यांनी शेततळे उभारले आहे. विहीर पूर्ण आटली असतानाही या शेततळ्याच्या जोरावर अजून ही फूल शेती तग धरून आहे़
विहीर आटली तरीही दुष्काळात उमलली फुलं !
By admin | Updated: May 27, 2016 21:57 IST