सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने दुथडी भरून वाहणारी धोम-बलकवडी ही दोन्ही धरणे कोरडी ठाक पडण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याची आवर्तने सुरू करताना कालवे फोडून पाणी चोरीला जाण्याचे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे धरणातील पाणी पाटात सोडताना जागोजागी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. धोम-बलकवडी धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वाई, कोरेगाव, फलटण या तिन्ही तालुक्यांत चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची या बैठकीला उपस्थिती होती.रामराजेंनी धोम-बलकवडीत अत्यल्प पाणीसाठा असल्याने चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘अधिकाऱ्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले, तरच रब्बी हंगामात पिकांना पाणी देता येईल. वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण या तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दोन्हींकडे पाणी योग्य प्रमाणात द्यायला हवे.’ (प्रतिनिधी)
धोम-बलकवडीचे पाणी पोलीस बंदोबस्तात !
By admin | Updated: October 30, 2015 23:29 IST