सातारा : दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चाैदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना समजल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सूत्रे हालवून दोन्हीही भोंदूबाबांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली.
रामचंद्र तुकाराम सावंत (वय ४५, रा. मोही, ता. माण), उत्तम कोंडिबा अवघडे (वय ५५, रा. गोंदवले, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्यांची वस्ती आहे. या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चाैदा वर्षीय मुलीचे सतत डोके दुखत होते. तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डाॅक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील उत्तम अवघडे या भोंदूबाबाकडे नेले. तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होइल, असे सांगून मंत्रतंत्र करून त्याने त्यांना घरी पाठवले. त्याच दिवशी सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या भोंदूकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पाैर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत. ते ठीक होणे खूप कठीण आहे, असे सांगितले.
चाैकट : रात्री बाराला पाच मिनिटे बाकी असतानाच मृत्यू
२० तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत बायलीला भयंकर धोका आहे, असे सांगून भोंदूबाबाने मंत्रतत्र व अंगारे धुपारे करून परत तिला घरी पाठवले. शनिवारी २० तारखेच्या रात्री घरातील सर्वजण बायलीला गराडा घालून काय होतेय ते केवळ बघत बसले. बायली शांत बसली होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. पण, तरीही सगळ्यांच्या नजरा घडाळ्याच्या काट्याकडे होत्या. सर्वजण बारा वाजण्याची वाट पाहात होते. रात्री बाराला पाच मिनिटे कमी असताना बायली निपचित पडली. यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे देवऋषींनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच भुताने बायलीला नेले, असा समज करून कुटुंबीयांनी काहीही बोभाटा न करता बायलीच्या मृतदेहाचे जवळ असलेल्या ओढ्याच्या शेजारी दफन केले.
चाैकट : घटना कशी उघड झाली...
ही घटना दहिवडीचे सैन्य दलातील जवान सुनील काटकर यांना अंनिसचे प्रशांत पोतदार यांना सांगितली. समाजात नाचक्की होइल तसेच देवऋषींच्या भीतीने या मुलीच्या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. आमची काहीही तक्रार नाही, असेही सांगितले. परंतु पोतदार यांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला. अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना भेटून त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर रात्रीचं सर्व सूत्रे हालली आणि काही वेळातच गुन्हा दाखल करून दोन्ही भोंदूबाबांना दहिवडी पोलिसांनी अटक केली.