सातारा : जिल्ह्यातील १७२ पैकी ९९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १ नोव्हेंबर) जिल्हाभर मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ६३५ जागांसाठी काट्याची टक्कर होणार आहे. एका रात्रीत सर्व चित्र पालटू शकते, त्यामुळे मतदानाआधीच्या रात्री उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जागता पहारा ठेवला होता. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तहसीलदारांच्या उपस्थित शनिवारी सायंकाळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान मशीनसह इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीसाठी ३२० केंद्रे निवडण्यात आली आहेत. सातारा तालुक्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने मतदानाची तयारी केली आहे. सातारा तालुक्यात ११७५ निवडणूक कर्मचारी १९८ केंद्रांवर सज्ज आहेत. कोरेगावमध्ये १५ केंद्रांवर १०६ कर्मचारी, जावळी तालुक्यात १६ केंद्रांवर ९० कर्मचारी, कऱ्हाड तालुक्यात ३२ केंद्रांवर १९५ कर्मचारी, माण तालुक्यात १६ केंद्रांवर १०५ कर्मचारी, पाटण तालुक्यात १५ केंद्रांवर ११६ कर्मचारी, वाई तालुक्यात १९ केंद्रांवर १०० कर्मचारी, महाबळेश्वर तालुक्यात ६ केंद्रांवर ८६ कर्मचारी, खंडाळा तालुक्यात ११ केंद्रांवर २१ कर्मचारी, फलटण तालुक्यात ३ केंद्रांवर ६५ कर्मचारी मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी) दोन ग्रामपंचायती अघटित महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे व वानवली तर्फ सोळशी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्जच दाखल न झाल्याने या दोन्ही ग्रामपंचायती अघटित राहिल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आला आहे. तर सातारा तालुक्यातील नांदगावची निवडणूक रद्द झाली आहे. जिल्ह्यातल्या ७० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे आता स्पष्ट झाले असून, १७२ पैकी ९९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
९९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By admin | Updated: November 1, 2015 00:05 IST