कार्वे : रोजगार हमीतून १९७२ मध्ये कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथे वाघदरा शिवारात पाझर तलाव बांधण्यात आला़ तेव्हापासून आजपर्यंत या तलावाची एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही़ गाळ काढण्यात आलेला नाही़ त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरी गळतीमुळे दोनच महिन्यांत तलावात ठणठणाट होतो़ सध्याही हीच परिस्थिती असून, तलावात थेंबभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही़यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस मान्सूनपूर्व पावसानेच अनेक ठिकाणचे तलाव भरून वाहू लागले होते़ त्यानंतर मान्सून लांबल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले़ मात्र, जुलै अखेरीस पावसाने जोर धरला़ संततधार पावसामुळे तलावांसह ठिकठिकाणची धरणेही शंभर टक्के भरली़ काही बंधारे तसेच धरणांतून पाणीही सोडावे लागले़ चांगला पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्रच पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे़ कऱ्हाड तालुक्यात अशी परिस्थिती असताना कार्वे गावात मात्र याउलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे़ पावसाळा संपताच येथील तलावात पाणीसाठा कमी झाला आहे़ तलावात सध्या अजिबात पाणी नाही़ चाळीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारण्यात आला़ मात्र, त्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाझर तलावाची गळती काढण्याबाबत अनेकवेळा ग्रामसभेत ठरावही करण्यात आला आहे़ संबंधित ठरावाची प्रत वेळोवेळी लघुपाटबंधारे विभागास पाठविण्यात आली आहे़ मात्र, तरीही लघुपाटबंधारे विभाग या तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे़१९७२ मध्ये ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यावेळी रोजगार हमी योजनेतून हा तलाव साकारण्यात आला़ भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती़ त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या साधनसामूग्रीच्या जोरावर या तलावाचे काम झाले़ मात्र, सध्याच्या घडीला हे काम निकृष्ट असल्याचेच दिसते़ बांधकाम कमकुवत असल्याने तलावाला गळती लागली आहे़ यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.काहीवेळा लघू पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी येऊन पाझर तलावाची पाहणी केली आहे़ तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे त्यांनीही मान्य केले होते़ मात्र, त्यानंतर काहीच कार्यवाही होत नाही़ शासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे़कार्वेतील हा तलावात पाणीसाठा टिकून राहिला तर परिसरातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरकार्वेतील हा वाघजाई पाझर तलाव वाघदरा नावच्या शिवारात आहे़ या शिवारात उन्हाळ्यामध्ये जनावरे चारण्यासाठी नेली जातात़ तसेच आसपासच्या वस्त्यांवरील लोकही याच तलावातील पाण्याचा पिण्यासाठी व इतर खर्चासाठी वापर करतात़ सध्या पावसाळा संपताच तलावातील पाणीही आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत़ यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
थेंबे थेंबे तळे रिकामे !
By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST