आजरा : पवनचक्की, खाणकाम, प्रचंड जंगलतोड आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास या पार्श्वभूमीवर आजरा तालुका जंगल विकासाचा पथदर्शी प्रयोग सुरू करावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने उद्या, मंगळवारी आजरा तहसीलवर मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.देसाई म्हणाले, पवनचक्की, खाणकाम, जंगलतोड यामुळे जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा शेतीपिकाकडे वळवला आहे. जंगली प्राणी आणि मनुष्य यांचे परस्परपूरक सहजीवन निर्माण होण्यासाठी तात्पुरते उपाय करून चालणार नाही. त्यासाठी जंगलाच्या समृद्धीकरणासाठीचे खास प्रयत्न झाले पाहिजेत. त्याची सुरुवात म्हणून आजरा तालुका जंगल विकासाचा पथदर्शी प्रयोग तातडीने सुरू करावा. यामध्ये प्रामुख्याने हत्ती, गवे, इत्यादी वन्य प्राण्यांपासून होणारे शेती पिकाचे कायमचे नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. भुदरगड व आजरा तालुक्याचा सीमेवर जैवविविधतेचा कायदा धाब्यावर बसवून पवनचक्की उभारण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवावे, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, या मागण्या करण्यात येणार आहेत.
जंगल विकासाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करा : श्रमुद
By admin | Updated: September 22, 2014 22:22 IST