कुडाळ : प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमदार शशिकांत शिंदे, विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे, बचाव समिती अध्यक्ष सुहास गिरी यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी नेत्यांनी उमेदवारांची मनधरणी करीत कसरत करूनही अखेर २१ पैकी २० जागा बिनविरोध करण्यात यश आले. तर एका जागेसाठी निवडणूक लागल्याने प्रतापगडचे बिनविरोधचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. मुळातच हा कारखाना किसन वीरला भाडेतत्त्वावर चालवण्यास दिल्यामुळे प्रतापगडमध्ये जाणारे संचालक हे केवळ नामधारीच असणार आहेत. तरीदेखील इच्छुकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष सुहास गिरी यांनी प्रथमच सहकारातील निवडणुकीत हस्तक्षेत करीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या निवडणुकीत तटस्थ भूमिकेत होते. मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी बचाव समितीला सात जागा सत्ताधारी गटाने देऊन तोडगा काढला होता आणि त्यामुळे नाईलाजाने आपल्या बगलबच्च्यांना बाजूला ठेवत सत्ताधारी गटाने सात जागा देण्याचे मान्य केले.मात्र, कुडाळ गटात बचावसमिती निमंत्रक मालोजीराव शिंदे यांना सत्ताधाऱ्यांचा विरोध होता. राजेंद्र शिंदे यांच्यावर सहमती झाली होती;मात्र मालोजीराव शिंदे यांनी मला विरोध आहे, तर मी माघार घेणार नाही, असे म्हणत निवडणुकीसाठी दंड थोपटले. दस्तुरखुद्द आमदार शिंदे यांनादेखील त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत माघार घेणार नसल्याचे स्वाभिमानाने सांगितले. त्यामुळे अखेर त्यांना बिनविरोध घेऊन सर्व ऊस उत्पादक मतदारसंघ बिनविरोध करण्यात आले. तर हुमगाव गटात एकेकाळचे सुनेत्रा शिंदे यांचे समर्थक व सध्याचे विरोधक चंद्रकांत तरडे, प्रदीप तरडे हेदेखील बिनविरोध आले. मेढा गटात नारायण शिंदे यांना डावलल्यामुळे सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे यांच्या भविष्यात अडचणी वाढणार, हे निश्चित. एवढे करूनही ‘ब’ वर्गात राजेंद्र शिंदे, तानाजी शिर्के यांनी माघार न घेतल्याने निवडणुकीचा सामना करावा लागला. बचावसमितीला राजेंद्र शिंदे यांच्यासाठी प्रयत्न करावा लागणार तर सुनेत्रा शिंदे यांना शिर्के यांना निवडून आणावे लागणार अन्यथा त्यांची मोठी राजकीय नाचक्की होणार, हेनिश्चित. (प्रतिनिधी)अर्ज अवैध ठरलेले तरडे बिनविरोधहुमगाव गटात बामणोलीचे प्रदीप तरडे यांच्या अर्जावर सत्ताधाऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरविला होता. मात्र, तरडे यांनी अपील करून आपला अर्ज वैध करून घेतला. त्यामुळे या गटात निवडणूक लागणार, हे निश्चित होते. मात्र, बिनविरोधच्या प्रयत्नात नको-नको म्हणणाऱ्या प्रदीप तरडे यांना बिनविरोध घेऊन सत्ताधारी शिंदे गटावर नामुष्कीची वेळ आली.
‘बिनविरोध’साठी नेत्यांची तारेवरची कसरत
By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST