‘नशीब बदलायला वेळ नाही लागत!’ असं कधीतरी कुठं तरी जाहिरातीत आम्ही पामरांनी वाचलेलं; पण एकाच वेळी ‘कुणाचं भाग्य फळफळलं’ तर ‘कुणाचं नशीब फुटलं’ अशा विरोधभासाच्या घटना पाहण्याचा योग मात्र सातारकरांनी अनुभवलेला. काय सांगू रावऽऽ कालपर्यंत जिथं साधं चिटपाखरूही फिरकत नव्हतं, तिथं आज अकस्मातपणे दहा हजारांची ‘लड’ उडाली... अन् जिथं गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड धामधूम सुरू होती, तिथं क्षणाधार्थ सामसूम निर्माण झाली. ‘महायुती’ अन् ‘आघाडी’च्या आकस्मिक घटस्फोटानंतर अनेक इच्छुक म्हणे, अनाथ झाले... तर अनेकांना राजकीयदृष्ट्या आधार मिळाला.साताऱ्यात ‘बाबाराजें’च्या विरोधात ‘दीपक पवार’ की ‘रवी पवार’ असा प्रश्न चर्चेत असताना आज अचानक ‘रजनी पवार’ नाव पुढं आलं. आता याला कारणीभूत अजित पवार आहेत, हा भाग वेगळा; कारण ‘स्वतंत्र लढलो तर राष्ट्रवादीलाच सर्वाधिक फायदा होईल, ’ असं ‘पीपीटी’ (कॉर्पोरेट कंपन्यांच्या भाषेत ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’) म्हणे अजितदादांनी थोरल्या काकांसमोर केलेलं. मग काय, आजपर्यंतचा अनुभव बाजूला ठेवून काकांनी दादांवर विश्वास टाकलेला.कोरेगावात किरण बर्गेंना आज अकस्मात मुंबईत बोलवून घेण्यात आलं. गावोगावच्या शिवारात ‘कणसे’ फुलत असतानाच अकस्मातपणे काँग्रेस परिवारात आशेचा ‘किरण’ चमकला होता. मात्र, शेवटच्या क्षणी ‘कणसें’नाच लॉटरी लागली. लोकसभेच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यात अजूनही मग्न असणाऱ्या जाधवांच्या पुरुषोत्तमांकडं बघून म्हणे ‘वाई-खंडाळ्यात कमळ’ फुललं. लोकसभेला मोदींची किटली जशी कऱ्हाडात फिरली होती, तसं मोदीचं कमळ वाईत फुलवण्याची संधी पक्षानं त्यांना स्वत:हून दिलीय. फलटणमध्ये मात्र, दिगंबरांची खेळी त्यांच्यावरच उलटलीय. महिनाभरापूर्वी ‘स्वाभिमानी’त मोठ्या थाटामाटानं प्रवेश केलेल्या आगवणेंना म्हणे आता पुन्हा एकदा काँग्रेसचा ‘अभिमान’ वाटू लागलाय; कारण फलटणचे हिंदुराव म्हणे, कधीच काँग्रेसच्या विरोधात जाणार नाहीत. तशीच गत पाटणच्याही हिंदुरावांची झालीय. पाटणच्या आमदारकीशी देणं-घेणं नसल्याच्या थाटात वावरणारे हिंदुराव अचानकपणे चर्चेत आलेत. त्यांनी बाबांच्या ‘राहुल’ला पाठिंबा दिलाय. पाटणचा राजकीय इतिहास बदलण्याची भाषा ढेबेवाडी खोऱ्यात घुमू लागलीय. कऱ्हाडात तर कुणालाच कुणाचा मेळ लागेनासा झालाय. आघाडी फुटली म्हणून ‘उत्तर’मध्ये बाळासाहेबांचा जीव कासावीस होऊ लागलाय, तर ‘दक्षिण’मध्ये त्यांचेच बंधू सुभाषराव यांचा चेहरा भलताच फुललाय. ‘उत्तर’मध्ये ‘धैर्यशील’तर म्हणे भलत्याच खुशीत गाड्या भरून गावोगावी पेढे वाटून आलेत. मात्र, ‘दादा..निवडणूक अजून व्हायचीय!’ असं कार्यकर्त्यांनी हळूच कानात सांगितल्यावर त्यांचे पाय जमिनीवर आलेत. अशा बऱ्याच गमती-जमती आजूबाजूला घडू लागल्यात. यावर आपला ‘वॉच’ आहेच म्हणा.----सचिन जवळकोटे
कुणाचं भाग्य फळफळलं.. तर कुणाचं नशीब फुटलं!
By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST